Nashik News : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत रब्बी कांद्याची खरेदी ‘नाफेड’कडून मागील महिन्यात गुंडाळण्यात आली. आता एक महिना उलटत नाही तोच खरेदी करून साठवलेल्या कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक रितेश चौहान यांचा नाशिक दौरा झाला; मात्र कमालीची गोपनीयता पाळून त्यांनी भेटी दिल्या. त्यामुळे अनेक तर्कवितर्क व शंकांना उधाण आले आहे. ‘नाफेड’ने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणू नये अशी आग्रही मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांनी केली आहे.
एकीकडे पारदर्शकता आणल्याचे नाफेडचे संचालक सांगत आहेत. कांदा खरेदीनंतर महिन्यातच बफर स्टॉक वितरण करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र त्याची कुठलीही माहिती दिली जात नाही. एकीकडे रविवारी (ता. १८) व सोमवारी (ता. १९) व्यवस्थापकीय संचालकांचा दौरा कार्यालयीन असल्याचे अगोदर सांगण्यात आले.
मात्र माहिती घेण्याबाबत सोमवारी ‘नाफेड’चे शाखा व्यवस्थापक निखिल पाडदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नंतर तो व्यक्तिगत असल्याचे सांगत अधिक माहिती देण्याचे टाळले. गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहेत. आता मिळणाऱ्या दराचा काहीसा दिलासा आहे. यापूर्वी ‘नाफेड’ने खरेदी केली त्यात स्पर्धात्मक दर दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या हिताची ही खरेदी झाल्याचे दिसलेले नव्हतेच. काही ठिकाणी खरेदीत गोंधळ दिसत आहे.
सलग चार वर्षे कवडीमोल दराने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठे थोडाफार कांद्याला दर मिळण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीतून मागील कालावधीतच झालेले नुकसान आता भरून निघण्याची संधी आहे. अशा वेळी बाजारभाव पाडण्यासाठी सरकारने नाफेडच्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तो लगेच बाजारात आणू नये; अन्यथा शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक होईल.भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
कांद्याचा बफर स्टॉक मार्केटमध्ये उतरवणे म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण आहे.संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अगोदर कांदा खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आता पुन्हा पुरवठ्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडे कांदा जाणार आहे. पुढे कांद्याची तूट निर्माण होऊन त्याचा फायदा व्यापारी व अधिकारी घेतील. अद्याप ग्राहकांची ओरड नसल्याने किमान दोन महिने हा कांदा बाजारात आणू नये. गरज निर्माण झाल्यास सरकारने रेशन प्रणालीच्या माध्यमातून पुढे वितरीत करावा. सध्या तशी परिस्थिती नाही यात शेतकऱ्यांचे हित नाही शिवाय ग्राहकांचे सुद्धा नाही.निवृत्ती न्याहारकर, विभागीय अध्यक्ष, जय किसान फार्मर्स फोरम
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.