Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Agriculture Exhibition 2024 : बदलत्या हवामान स्थितीत बहुविध पीक पद्धतीच तारेल

Team Agrowon

Agriculture Expo 2024 : बदलत्या हवामान स्थितीत शेतीपुढे अनंत आव्हाने आहेत. अशा परिस्थितीशी जुळवून घेत शेती करावी लागेल. कमी पाण्यावरील फळपिकांची निवड, त्याचबरोबर पूरक उद्योगांची साथ व बहुवीध पीक पद्धतीच प्रतिकूल परिस्थितीतील शेतीला तारू शकेल असा सूर ॲग्रोवन कृषी प्रदर्शनातील ‘लढा दुष्काळा’शी या चर्चासत्रात शुक्रवारी (ता. १२) तज्ज्ञ, शेतकऱ्यांकडून उमटला.

कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी लढा दुष्काळाशी या विशेष चर्चासत्रात तज्ज्ञांबरोबर प्रगतिशील शेतकऱ्यांनीही मार्गदर्शक म्हणून भाग घेतला. या वेळी ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, बार्शी (जि. सोलापूर) येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी राजेंद्र देशमुख, चिंचवडगाव (जि. बीड) येथील प्रगतीशील, अभ्यासू शेतकरी प्रल्हाद गवारे, केहाळ (जि. परभणी) येथील कृषिभूषण मधुकर घुगे उपस्थित होते.

प्रास्ताविकात ॲग्रोवनचे संपादक संचालक चव्हाण म्हणाले, की यंदा मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाचे प्रमाण खूप कमी राहिले. या परिस्थितीत शेतकरी नव्या वाटा शोधत आहेत. ॲग्रोवनने यंदाच्या कृषी प्रदर्शनात उभारलेल्या लढा दुष्काळाशी दालनात प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशकथांचे प्रदर्शन दालनाच्या माध्यमातून भरवले आहे. नैसर्गिक संकटांवर कशी मात करायची हे सांगण्याचाच त्यामागे हेतू असल्याचे ते म्हणाले.

चर्चासत्रात मुख्य विषयावर बोलताना डॉ. मोटे म्हणाले, की बदलत्या हवामानामुळे जगभरातील शेतीपुढे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. पाऊस पडण्याचा कालावधी कमी झाला आहे. मराठवाड्यात यंदाही दुष्काळ आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेतीला बसतो आहे. जगण्याचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे शेती आता पूर्वीसारखी परवडणारी राहिलेली नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतीत तुलनेने विविधता आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे पर्याय निर्माण केले आहेत. त्याच धर्तीवर मराठवाड्यासारख्या दुष्काळी प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती संजीवनी ठरत आहे.

शेतकरी राजेंद्र देशमुख म्हणाले, की माझ्या प्रगतीत ॲग्रोवनचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी निराश न होता शेती करावी. ग्राहकांची आणि बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यानुसार पिकविले पाहिजे. उत्पन्न खर्चानुसार नियोजन केले पाहिजे. ड्रॅगनफ्रूट, खजूर, सीताफळ, शेवगा, जांभूळ आदी फळपिकांचे वर्षभर उत्पन्न मिळत राहते. त्यातून चांगले अर्थार्जन होत असल्यामुळे मी समाधानी आहे असे श्री. देशमुख म्हणाले.

शेतकरी प्रल्हाद गवारे म्हणाले, की ॲग्रोवन हे दैनिक शेती व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत उपायोजना सुचवित असते. हवामान बदलांमुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. एकाच पिकांवर अवलंबून न राहता बहुविध पीक पद्धतीचा अंगीकार करायला हवा. कुटुंबाच्या दैनंदिन गरजेपुरता भाजीपाला, फळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावरच पिकवायला हवा. तरच अन्य पिकांच्या उत्पन्नातील तूट कमी होईल.

मधुकर घुगे म्हणाले, की शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता जपली पाहिजे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक नियोजन करायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT