Onion Export
Onion Export Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारने गुजरातमधील २ हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना काढल्यानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संपात व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असताना फक्त गुजरातला पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख खासदार शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. २७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'गुजरातच्या कांदा उत्पादकांना न्याय अन् महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांवर अन्याय', अशी टीका पवार यांनी केली आहे. पवार यांच्या पाठोपाठ राऊत यांनी, 'मोदी हे महाराष्ट्र द्वेष्टी राजकारण करत असून ते देशाचे नाही फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत', असे म्हटले आहे. पवार यांनी माढ्यात ही टीका केली आहे. तर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाना साधला आहे. 

देशभरात कांदा निर्यातबंदी असताना मोदी सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील पांढरा कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. यावरून राज्यात राजकारण तापले आहे. 'केंद्र सरकारचे हे धोरण महाराष्ट्रातील शेतकरी हिताचे नाही', अशी टीका कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत असतानाच पवार यांनी मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. पवार यांनी, 'केंद्र सरकार आणि मोदी फक्त गुजरातचा विचार करत आहेत. गुजरातमधील दोन हजार मे.टन पांढरा कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. सरकारचे हे धोरण महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यावर अन्याय करणारे आहे', असे म्हटले आहे. ते माढा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. 

पुढे पवार म्हणाले, 'कांदा निर्यात करण्यास परवानगी आहे. मात्र ती लाल कांद्याला नाही. फक्त पांढऱ्या कांद्याला आहे'. 'यावरून एकच समोर येत आहे की, मोदी सरकारमध्ये शेतकरी हिताची एकही गोष्ट होणारी नाही. हे सरकार शेतकऱ्यांना भेदभावाची वागणूक देत आहे', असा आरोप देखील पवार यांनी केला आहे. 

तसेच राऊत यांनी कांदा निर्यात परवानगीवरून पंतप्रधान मोदींवर टीका करताना, 'गुजरातला परवानगी दिलेला कांदा महाराष्ट्रातील मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातूनच जाणार आहे. पण यात राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा नाही. मात्र  गुजरातच्या ठेकेदार आणि व्यापाऱ्यांचा तो कांदा आहे. फक्त गुजरातच्या ठेकेदार आणि व्यापाऱ्यांना मालामाल करण्याचा डाव' असल्याचे म्हटले आहे. 

'महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांद्यातून दोन पैसे मिळत असतानाच कांदा निर्यात बंदी लादण्यात आली. राज्याचा कांदा सडवला जात आहे. महाराष्ट्रातूनच गुजरातचे व्यापारी कांदा खरेदी करून नेत आहेत आणि आता तोच निर्यात होणार आहे. यामुळे गुजरातच्या व्यापाऱ्याकडील पांढरा कांदा पंतप्रधान मोदींना प्रिय असून महाराष्ट्राचा कांदा सडवा, तो रस्त्यावर टाका, शेतकऱ्यांना तडफडवा या धोरणातून मोदी यांचा महाराष्ट्र द्वेष दिसतो,' अशी टीका राऊत यांनी केली आहे. 

तसेच राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना, 'शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या पचणी पडलेले नाही', अशी टीका केली होती. यावरून राऊत यांनी, 'या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे राज्यातील ८.५ कोटी शेतकऱ्यांना २ हजार एकर शेती आणि शेतात उतरण्यासाठी पाच पाच हेलिकॉप्टर द्या', असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT