Nagpur News : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. या कामांसाठी ११ जणांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया न राबवताच सर्व कामे देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत या मुद्द्यावरून सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
मातोश्री पाणंद रस्त्यासाठी २०२३-२४ साठी जिल्हा नियोजन समितीतून (डीपीसी) ७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक निधी असल्याचे सांगण्यात येते. पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी ११ जणांचे पॅनेल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निश्चित करण्यात आले आहे.
या पॅनेलच्या माध्यमातूनच पाणंद रस्त्यांची सर्व कामे करण्यात येत आहे. बुधवारी (ता.२४) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणंद रस्त्यांच्या कामांचा मुद्दा चर्चेला आला. नाना कंभाले यांनी हा मुद्दा उपस्थित करीत निविदा न काढता या ११ जणांच्या माध्यमातूनच कामे करणे नियमात आहे का, असा सवाल उपस्थित केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा विषय असल्याचे सांगत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कल्पना इखार यांनी जास्त माहिती देण्याचे टाळले. पाणंद रस्त्यासाठी मुरूम व गिट्टीचा वापर होत नसून रस्त्याकडील मातीच टाकण्यात येत असल्याचा आरोप उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी केला. आचारसंहितेच्या काळात अनेक कामे करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. याबाबत माहिती घेऊन उत्तर देता येईल, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
हे सर्व ११ ही जण एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. नियमांना डावलून पाणंद रस्त्यांचे काम होत आहे. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ताही योग्य नसून बिलही काढण्यात आले.- कुंदा राऊत, उपाध्यक्षा, जिल्हा परिषद
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.