Marriage Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Marriage Crisis: ग्रामीण भागात लग्न जुळवणे झाले कठीण

Farmer Marriage Struggles: गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात लग्ने जुळवण्यात सातत्याने अडचणी वाढत चालल्या आहेत. शेतकऱ्यांच्या घरात नांदायला ‘सून’ मिळणे कठीण झाले आहे. मुलांच्या लग्नाचे वय ग्रामीण भागात वाढत चालले असून अनेकांनी तर लग्न जुळण्याची आशा सोडून दिली आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात लग्ने जुळवण्यात सातत्याने अडचणी वाढत चालल्या आहेत. शेतकऱ्यांच्या घरात नांदायला ‘सून’ मिळणे कठीण झाले आहे. मुलांच्या लग्नाचे वय ग्रामीण भागात वाढत चालले असून अनेकांनी तर लग्न जुळण्याची आशा सोडून दिली आहे. अशातच नव्याने ‘सीबिल’चे नवे संकट उभे ठाकले आहे. अशा बिकट परिस्थितीत नात्या-गोत्यातील मुलींशी लग्ने जुळवून घेण्याकडे कल वाढत चालला आहे.

अकोला व लगतच्या जिल्ह्यांमध्ये अनेकांकडे शेती असूनही कुणी मुलगी द्यायला तयार नाही, अशी असंख्य उदाहरणे समोर येत आहेत. घरी चारपाच एकर शेती, एकुलता मुलगा, चांगले घरदार, लग्न जुळवण्यासाठी अपेक्षित असलेल्या अशा विविध बाबी असूनही लग्नासाठी मुली द्यायला कुणी तयार होताना दिसत नाही. गावोगावी अशा प्रकारांनी ‘वरपिता’ सध्या चिंतातुर झालेले आहेत. शेती असलेल्यांची ही अवस्था असून जे भूमिहीन आहेत, अशांकडे लग्नाची विचारणासुद्धा केली जात नसल्याचे विदारक चित्र तयार झालेले आहे.

दुसरीकडे अकोला जिल्ह्यात नुकतेच मूर्तिजापूर येथे ‘सीबिल’च्या कारणाने सोयरीक तुटल्याची घटना समोर आली. लग्न जुळण्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना मुलाचे ‘सीबिल’ तपासले जावे अशी एका नातेवाइकाने अपेक्षा केली होती. त्यानंतर मुलाचा सीबिल कमी भरल्याने थेट लग्न तोडण्यात आले. हा विषय राज्यभर चर्चेत आलेला आहे. शिवाय आता लग्न जुळवताना नवनवीन अपेक्षा वाढत आहेत.

मुलाला नोकरी हवी, घरी शेतीसुद्धा पाहिजे. यापैकी काही नसेल तर लग्न जुळत नाही. मुलाकडील नातेवाइकांना मुलगी दाखवण्यात सुद्धा मागेपुढे केले जाते. शेतकरी कुटुंबातील मुलींची लग्नेही अशीच अनेक अपेक्षा ठेवूनच जुळत आहेत. यात शेतकरी कुटुंबातील मुलांची अधिक वाताहत झालेली बघायला मिळत आहे.

सरकारी नोकरी करणारा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असला तरी पहिली पसंती नोकरदाराच्या वाटेला जात असल्याने भीषण स्थिती बनते आहे. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी कुटुंबातील मुलींसोबत विवाह केल्याच्या घटना घडल्या. हे विवाह पुढे फार काळ टिकले नाहीत. सामाजिक चालीरीतींमुळे आदिवासी मुली माहेरी गेल्यानंतर पुन्हा परतलेल्याच नाहीत. अशा विवाह जुळवण्यात मध्यस्थ दलालांचे मोठे रॅकेटसुद्धा तयार झाले होते. हा प्रकार आता थोडा कमी झाला आहे.

काहींनी ओलांडली चाळीशी

ग्रामीण भागात दिवसेंदिवस लग्न जुळवताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कुठलाही ‘वधूपिता’ हा शेतकऱ्याच्या कुटुंबात लग्न जुळवताना मागेपुढे पाहतो. मुलगा शहरात खासगी नोकरीवर असेल तर त्याच्याकडेही जमीनजुमला किती आहे, याचीही पडताळणी केली जात आहे. लग्न जुळत नसल्याने मुलांचे वय आधीच वाढले आहे. शिवाय अपेक्षित ‘वर’ शोधण्याच्या नादात मुलींचेही ‘वय’ वाढत चालले आहे. लग्नेच जुळत नसल्याने दिवसेंदिवस उपवरांचे वय कुठे ३०, कुठे ३५ तर काहींनी चाळीशीही ओलांडली. आधी शहरांमध्ये असणारे वाढलेल्या वयांचे ‘वर-वधूं’चे प्रमाणही ग्रामीण भागात तयार झाले.

‘हुंडा नको, मुलगी द्या’

लग्न जुळवताना असंख्य विनवण्या कराव्या लागत आहेत. काही वर्षांपूर्वी लग्न जुळवताना नात्यागोत्याला प्राधान्य दिले जायचे. दरम्यानच्या काळात हा ट्रेंड थोडा बाजूला गेला होता. आता पुन्हा नात्यातील मुला-मुलींची सोयरीक गुपचूप जुळवल्या जाऊ लागली आहे. नात्यांमध्ये लग्न जुळवताना आता ‘हुंडा नको, मुलगी द्या,’ एवढ्यावरच सोयरिकी होऊ लागल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT