Khandesh Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Water Shortage : खानदेशातील अनेक प्रकल्प कोरडेच

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील अनेक मध्यम, लघू प्रकल्प कोरडे आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्टा, पश्चिम भागातील प्रकल्पांत जलसाठाच नाही. गिरणा धरणातील पाणीही झपाट्याने कमी झाले आहे. प्रकल्प भरण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील अग्नावती, हिवरा, पारोळ्यातील बोरी, भोकरबारी, चाळीसगावातील मन्याड या मध्यम, लघू प्रकल्पांत शून्य टक्के जलसाठा आहे. तसेच अनेक प्रकल्पांतील जलसाठा अल्प किंवा १० ते २० टक्क्यांपर्यंतच आहे. पावसाळ्याचा एक महिना पूर्ण झाला आहे.

परंतु खानदेशातील सर्वांत महत्त्वाच्या गिरणा धरणातील जलसाठा फक्त ११ टक्केच आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. त्यात मागील पावसाळ्यात फक्त ५६ टक्के जलसाठा होता. हा प्रकल्प नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे. पण त्याचा लाभ जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांना होतो.

अल्प जलसाठा असलेले प्रकल्प

पाचोऱ्यातील बहुळा प्रकल्पात फक्त चार टक्के जलसाठा आहे. जामनेरातील तोंडापूर प्रकल्पात १७ टक्के, एरंडोलातील अंजनी प्रकल्पात ०.२५ टक्के जलसाठा आहे. धुळ्यातील बुराई, अमरावती, मालनगाव, सोनवद या प्रकल्पांतही जलसाठा अल्प आहे. फक्त पांझरा व अनेर या अनुक्रमे साकी व शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांचा जलसाठा काहीसा वाढला आहे.

सातपुड्यालगतचे प्रकल्प समाधानकारक स्थितीत

खानदेशात सातपुडा पर्वतालगतच्या प्रकल्पांत जलसाठा बरा आहे. त्यात नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील सुसरी लघू प्रकल्पांतही जलसाठा बरा आहे. तसेच धुळे जिल्ह्यात शिरपूरातील अनेर, जळगाव जिल्ह्यात चोपड्यातील गूळ प्रकल्पात ४५ टक्के, यावलमधील मोर प्रकल्पात ६७ टक्के, रावेरातील मंगरूळ प्रकल्पात ५२ टक्के, सुकीमध्ये ८२ टक्के, अभोडा प्रकल्पात ६१ टक्के जलसाठा आहे.

तापी नदीला प्रवाही पाणी

खानदेशात पावसाळ्यात फक्त गिरणा नदीला काही दिवस प्रवाही पाणी आले होते. तापी नदीलाही प्रवाही पाणी आहे. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर, जळगावमधील शेळगाव, धुळ्यातील सुलवाडे, नंदुरबारातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी नदीत पाणी सोडले जाते. कारण हतनूर धरणात पाण्याची आवक कमी व अधिक होत असते. परंतु तापी नदीसही मोठा पूर अद्याप आलेला नाही. धुळ्यातील सूर नदीलाही अलीकडेच पाणी आले होते. परतु अन्य नद्यांना खानदेशात चांगल प्रवाही पाणी नाही. टंचाईचे संकट खानदेशात अद्याप कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

Nana Patole : गोरगरिबांचा आधार

Nana Patole : जनसामान्यांचा आवाज- नाना पटोले

Vidarbha Development : पूर्व विदर्भाचे नवीन विकास मॉडेल- नाना पटोले

SCROLL FOR NEXT