Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : पाण्याचा योग्य वापर केला तरच जीवन

Water Shortage : पाण्याशिवाय प्राणी, वनस्पती किंवा सजीवाच्या शरीरात कोणतीही क्रिया होऊ शकत नाही. म्हणून अन्नापेक्षा पाण्याला जास्त महत्त्व दिलेले आहे. अर्थात, पाण्याचा योग्य वापर केला तरच जीवन अन्यथा विष! म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.

डॉ. भास्कर गायकवाड

डॉ. भास्कर गायकवाड

EL Nino Impact : एल-निनोच्या प्रभावाने या वर्षी कमी पाऊस पडेल, असे अंदाज दिले जात आहेत. पाणी भूगर्भातील असो की भूपृष्ठावरील पावसाचे पाणी, हाच पाण्यासाठी एकमेव स्रोत आहे. पाऊस कमी म्हणजे पाण्याची टंचाई हे सूत्र ठरलेले आहे. आणि पाणीटंचाई काळात राज्यात पाण्यासाठी कशा दाही दिशा फिराव्या लागतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

पाणी, जल ज्याला जीवन म्हणतात. पाणी असेल तरच जीवन अन्यथा निर्जीव. दगडाला पाझर फुटत नाही, अशी म्हण आहे. परंतु याच दगडापासून तयार झालेल्या डोंगरावर पाण्याचा पाझर फुटण्यामुळेच जंगल तयार होते आणि याच जंगलामध्ये विश्‍वातील अनेक जीवजिवाणू, वनस्पती, प्राणी आपले जीवन जगत असतात.

आदिमानवानेही याच जंगलापासून आपली सुरुवात केली. अशा या पाण्याचे महत्त्व फार आहे. आज ३.६० लाख प्राणी, जीवजिवाणू, वनस्पतींच्या प्रजातींना जिवंत ठेवण्याचे कार्य पाणी करत आहे. पृथ्वीच्या एकूण भूभागांपैकी ७० टक्के भूभाग पाण्याने भरलेला असून, ३० टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे.

या तीस टक्के जमिनीपैकी कमीत कमी ३३ टक्के जंगल असेल, तरच निसर्गाचे संतुलन राहील. तसेच योग्य प्रमाणात पाऊस पडून पाण्याचे संतुलन राहील असे अनेक वर्षांपासून सांगितले जाते. परंतु जंगलांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम एकूणच पाणी उपलब्धतेवर होऊ लागला आहे.

भारतामध्ये जंगलांचे प्रमाण तर फक्त १७.१७ टक्के असून, ही एक चिंतेची बाब आहे. जंगलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवामानातील तापमान वाढू लागले असून, बर्फाचे डोंगर वितळण्यास सुरुवात झाली आहे.

पृथ्वीचे तापमान याच गतीने वाढत राहिले, तर बर्फ वितळून सर्व पाणी समुद्रात मिसळून समुद्राची उंची २० ते ५० सें.मी. पर्यंत वाढून पृथ्वीचा बराच भाग पाण्याखाली जाईल, असे भविष्य अनेकांनी वर्तविलेले आहे. पाण्याशिवाय प्राणी, वनस्पती किंवा कोणत्याही सजीवाच्या शरीरात कोणतीही क्रिया होऊ शकत नाही.

म्हणून अन्नापेक्षा पाण्याला जास्त महत्त्व दिलेले आहे. अर्थात, पाण्याचा योग्य वापर केला तरच जीवन अन्यथा विष. कारण प्रमाणापेक्षा जास्त पाणी मानव, प्राणी पीत नाहीत. जमिनीलाही जास्त पाणी दिल्यामुळे जमिनी क्षारवट- चोपण झालेल्या आहेत. म्हणून पाणी मौल्यवान आहे. त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर करणे महत्त्वाचे आहे.

पिकाचे उत्पादन घेण्यासाठी पाणी हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशामध्ये जगाच्या १६ टक्के लोकसंख्या असून, फक्त दोन टक्के जमिनीत शेती केली जाते. अर्थात, जगातील दोन टक्के लागवडीयोग्य जमिनीसाठी ४.२ टक्के पाणी आपल्या देशात उपलब्ध आहे. तरीही आपण म्हणतो की देशात पाणी कमी आहे.

उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याच्या तंत्रज्ञानापासून आजही आपण मागे आहोत. यापुढील काळात पाण्याच्या वापराबाबत योग्य त्या तंत्रज्ञानाचा आणि पद्धतींचा वापर सुरू करावा लागणार आहे. कारण आजही उपलब्ध पाण्याच्या ८३ टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते.

परंतु पुढील १० ते १५ वर्षांत शेतीसाठी उपलब्ध पाण्याच्या फक्त ७२ टक्के पाणी उपलब्ध राहणार आहे. लोकसंख्या वाढत असल्यामुळे जास्त उत्पादन घेण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने कसा वापर करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे.

देशामध्ये ४० टक्के क्षेत्र ओलिताखाली असून, महाराष्ट्रात याचे प्रमाण फक्त १७ ते १८ टक्के आहे. मागील दोन-तीन दशकांमध्ये देशामध्ये जन्मदर कमी झाला असला तरी माणसाचे आयुष्यमान वाढून मृत्युदर घटल्यामुळे लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्तच आहे.

म्हणजेच कमी होत असलेले पाणी, जंगलतोड आणि त्यामुळे कमी व अवेळी पर्जन्यमान, अतिदुष्काळ किंवा पाऊस आणि या परिस्थितीमध्ये शेती उत्पादन वाढवून वाढणाऱ्‍या लोकसंख्येला अन्न निर्माण करणे ही खरी तारेवरची कसरत कोणताही आधार नसणाऱ्‍या शेतकऱ्‍यांना करावयाची आहे. म्हणूनच या सर्व बाबींचा विचार करण्याची वेळ आली आहे.

शेतात पाणी तरच शेतकऱ्‍यांच्या अंगात पाणी या उक्तीप्रमाणे शेतकऱ्‍यांनी शेतात पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पडणाऱ्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, याचा विचार केला पाहिजे.

शेतातील पाणी शेतात आणि गावातील पाणी गावात, या पद्धतीने पाणी व्यवस्थापनाचे सूत्र वापरून नंतर गरजेनुसार बाहेरच्या पाण्यावर अवलंबून राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

पाण्याचे स्रोत कमी होण्याची मुख्य कारणे म्हणजे पाण्याचा अतिउपसा, जमिनीमध्ये पाणी पुनर्भरण करण्यासाठी उपलब्ध सुविधांचा अभाव, पाण्याच्या अतिरेकी वापरामुळे तयार झालेल्या क्षारवट- चोपण जमिनी, जमिनीची कमी होत असलेली जलधारण क्षमता, कमी निचरा आणि पिकासाठी अयोग्य असलेले प्रदूषित पाणी.

म्हणूनच पाणी व्यवस्थापन करत असताना पाण्याचे स्रोत सुधारण्याबरोबरच उपलब्ध झालेल्या पाण्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे यावरही विशेष भर द्यावा लागणार आहे.

(लेखक शेती-पाणी प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT