Nanded News : आगामी खरीप हंगामासाठी एकूण सात लाख ७६ हजार ७६२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. या हंगामात शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करण्यास कमतरता भासू देऊ नका, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी प्रशासनाला दिले.
ख्ररीप हंगाम २०२५ पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात गुरुवारी (ता. एक) झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवठा व्यवस्था योग्यरितीने करावा, त्यांना बियाणे व कीटकनाशकांची उपलब्धता वेळेत होईल याचे नियोजन कृषी विभागाने करावे. जिल्ह्यातील बोगस बी-बियाणे पुरवठा करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांची जास्तीत जास्त माहिती होण्यासाठी कृषी विभागाने व्हॉटसअप ग्रुप तयार करून त्याद्वारे त्यांनी आवश्यक माहिती पोहोचवावी.
कृषी क्षेत्रात एआयचा वापर करुन शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असेही निर्देश त्यांनी दिले. ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात त्यांना शासनाकडून देण्यात येणारी सवलत कमी करण्याबाबतही त्यांनी सांगितले. यासोबत त्यांनी अर्धापूर व मुदखेडला केळी निर्यात सुविधा केंद्र व धर्माबादला मिरची संशोधन केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला.
नांदेडला सोयाबीन प्रक्रिया उद्योगासह आयसीएआरचे केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी पीपीटीद्वारे जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी केलेल्या पूर्वतयारीच्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी राज्यस्तर प्रथम क्रमांक विजेते माधव पाटील (रा. चैनपूर ता. देगलूर) व सुनिल चिमनपाडे (रा. कुडली ता. देगलूर) यांना द्वितीय क्रमांक मिळाल्याबाबत त्यांचा सन्मान करण्यात आला.
पीकविमा कमी प्रमाणात वितरित
जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये पीकविमा खूप कमी प्रमाणात वितरित होत आहे. याबाबत तालुकास्तरावर नियोजन असावे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तालुका पातळीवर व्यवस्था करावी, विमा कंपनीने आतापर्यंत किती रक्कम वितरित केली, अजून किती रक्कम येणे शिल्लक आहे याची वर्षनिहाय माहिती द्यावी. उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर, जिल्ह्यात जलसंधारण व जलसंपदाच्या मंजूर प्रकल्पांना निधी उपलब्ध व्हावा, मक्याचे क्षेत्र वाढावे यासाठी उपाययोजना आखाव्यात अशा सूचना खासदार अशोक चव्हाण यांनी केल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.