Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Water Demand: खडकवासला कालव्यातून हवीत दोन आवर्तने; शेतकऱ्यांची पाणी व्यवस्थापनासाठी मागणी!

Farmer Issue: खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याबरोबर रब्बीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Team Agrowon

Indapur News: खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याबरोबर रब्बीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. उसाची तोडणी झाल्यामुळे राखलेल्या खोडव्याला व मोकळ्या झालेल्या शेतात रब्बीतील पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. यामुळे रब्बीतील आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.

गेल्या काही वर्षांपासून खडकवासला कालव्याच्या जीवावरील शेती व्यवसाय अडचणीत आल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. आवर्तनातील अनियमितता, कालवा व वितरिकांची दुरवस्था यामुळे शेतकऱ्यांसाठी कालव्याचे पाणी मृगजळ ठरत आहे. यातच पुण्याची वाढती पाण्याची मागणी व शेती सिंचनापेक्षा पिण्याच्या पाण्याला असलेले प्राधान्य यामुळे टेलला असलेल्या इंदापूरकरांना कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

परिणामी कालव्याच्या एकूण लाभक्षेत्राच्या केवळ दहा टक्के क्षेत्र सिंचित होत असल्याची वस्तुस्थिती आहे. कालव्याच्या जीवावर शेती करायची म्हणजे जुगार खेळल्याप्रमाणे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. कालव्याच्या पाण्याची शाश्वती राहिली नसल्याने, पीक लागवडीचा जुगार खेळायचे धाडस करण्याचे शेतकरी टाळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

यंदा धरणात मुबलक पाणीसाठा असूनही अद्याप पाणी वितरणाचे नियोजन झालेले नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक अद्यापही झाली नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळ्यात किती आवर्तने मिळणार हे अजूनही गुलदस्तात आहे. तर पुण्याने मंजूर पाण्यापेक्षा वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी केल्याने, इंदापूरकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

सध्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणीपातळी घटली आहे. तलाव, बंधारे, ओढे, नाले कोरडे पडले आहेत. यामुळे सध्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाची नितांत गरज आहे. यामुळे कालव्याचे रब्बीचे आवर्तन तातडीने सुरू करण्याबरोबर उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे साकडे

नुकत्याच्या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कळस येथे शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्यासाठी साकडे घातले. रब्बीतील आवर्तन सुरू करण्याबरोबर उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली प्रतापराव पाटील, सरपंच सविता सुरेश खारतोडे, भरतराजे भोसले, सुरेश खारतोडे, रमेश खारतोडे, विशाल राजेभोसले, सन्मान पाटील, विजय गावडे, विनोद पोंदकुले यांसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT