Pune News : राज्यपाल रमेश बैस यांच्या बदलीच्या बातम्यांना मध्यंतरी वेग आला होता. तर त्यांना मुदत वाढ मिळणार की राज्याला नवे राज्यपाल मिळणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. याचदरम्यान शनिवारी (ता.२७) मध्य रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्तीचे आदेश दिले. यामुळे रमेश बैस यांच्या जागी राज्याला नव्या राज्यपालांची नियुक्ती झाली आहे. बैस यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यातील भाजपचे जेष्ठ आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान राज्यात काहीच महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने राधाकृष्णन यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
मावळते राज्यपाल बैस यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे १८ फेब्रुवारी २०२३ रोजी हाती घेतली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बैस यांच्याआधी भगतसिंह कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल होते. कोश्यारी ५ सप्टेंबर २०१९ ते १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत साडे तीन वर्ष महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होते. मात्र कोश्यारी यांती कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने त्यांच्या जागी बैस यांनी नियुक्ती करण्यात आली होती. तर आता राधाकृष्णन महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल झाले आहेत.
राष्ट्रपती मुर्मू यांनी राधाकृष्णन यांच्यासह देशातील विविध राज्यांमधील नवीन राज्यपालांची नियुक्ती करत नियुक्तीपत्रे दिली आहेत. तसेच त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देखील दिली आहे. दरम्यान मुर्मू यांनी पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक असणाऱ्या बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामाही स्वीकारला आहे.
राधाकृष्णन यांचा अल्पपरिचय
राज्याचे नवे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन तामिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते आणि झारखंडचे माजी राज्यपाल आहेत. तिरुपूरमध्ये त्यांचा जन्म ४ मे १९५७ साली झाला असून ते वयाच्या १६ वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. ते दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडणून आले आहेत. तर तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतींनी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. त्यानंतर फक्त दीड वर्षांत त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत हरिभाऊ बागडे?
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यावर राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे छत्रपती संभाजीनगरला प्रथमच राज्यपालपदाचा मान मिळाला आहे. बागडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले असून त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. भाजपच्या सुरूवातीच्या काळात म्हणजेच १९८५ मध्ये ते पहल्यांदा आमदार झाले. तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते आमदार झाले होते. १९९५ मध्ये बागडे रोहयो मंत्री झाले. २००९ मध्ये फुलंब्रीतून त्यांचा पराभव झाला. मात्र नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनदा ते पुन्हा आमदार म्हणून निवडणून आले. २०१४ ते २०१९ या ५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
कोणत्या राज्यांमध्ये झाली राज्यपालांची नियुक्ती?
हरिभाऊ किसनराव बागडे (राजस्थान), जिष्णु देव वर्मा (तेलंगणा), ओम प्रकाश माथूर (सिक्कीम), संतोष कुमार गंगवार (झारखंड), रामेन डेका (छत्तीसगड), सीएच विजयशंकर (मेघालय), सी. पी. राधाकृष्णन (महाराष्ट्र) अतिरिक्त कार्यभार, गुलाबचंद कटारिया (पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक पद), लक्ष्मण प्रसाद आचार्य (आसाम आणि मणिपूरचा अतिरिक्त कार्यभार)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.