PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : ‘पीएम किसान’ नोंदणीत ‘सीएससी’ केंद्रांचा समावेश

मनोज कापडे

Pune News : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी १५ जूनपर्यंत राज्यभर नोंदणी मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत आता सामाईक सुविधा केंद्रांना (सीएससी) सहभागी करून घेण्यात आले आहे.

कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीएम किसान’ योजनेसाठी शेतकऱ्यांना स्वयंनोदणी तसेच ई-केवायसी करावी लागते. त्यासाठी आता गावातील सीएससी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. आधार संलग्न बॅंक खाते उघडण्यासाठी शेतकऱ्यांना टपाल खात्याने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेत शेतकऱ्यांना खाते उघडता येईल.

‘पीएम किसान’ योजनेसाठी गावपातळीवर सुरू झालेल्या मोहिमेत जमिनीचा तपशीलदेखील अद्ययावत केला जात आहे. भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास शेतकऱ्यांनी गावच्या तलाठ्याशी किंवा तहसीलदाराशी संपर्क साधावा. ई-केवायसी व आधार संलग्न करण्यासाठी ‘सीएससी’ केंद्रातून सेवा मिळेल.

दरम्यान, या योजनेचा १७ वा हप्ता जूनअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची ‘ई-केवायसी’ केली जात आहे. मात्र, त्यासाठी सामाईक सुविधा केंद्रात शुल्क भरावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांत एका वर्षात सहा हजार रुपयांचे अनुदान मिळेल.

कृषी विभागातील एका क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शेतकरी स्वतः भ्रमणध्वनीवरील ओटीपी किंवा पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी कोणत्याही एका सेवेमार्फत प्रमाणीकरण करू शकतात. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाराशिवारात जाऊन मार्गदर्शन केल्याशिवाय ही कामे पुढे नेणे अशक्य आहे. महसूल खात्याने ‘पीएम किसान’ची कामे बळजबरीने कृषी खात्याच्या अंगावर टाकली आहेत.

ई-केवायसीचे प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केवळ कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी करतात. परंतु महसूल व ग्रामविकास विभागाचा क्षेत्रिय कर्मचारी वर्ग या योजनेची कामे करण्यास नाखूष आहेत. शेतकऱ्यांना सामाईक सुविधा केंद्रापर्यंत नेणे व नोंदणी करून घेणे ही सध्याची मोठी समस्या आहे. त्यासाठी ग्रामस्तरीय समन्वयक अधिकाऱ्याने प्रमाणीकरण पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु तेदेखील पूर्ण क्षमतेने कामे करीत नाहीत.

९०.८० लाख जणांची ई-केवायसी पूर्ण

राज्यात आतापर्यंत ९०.८० लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. या शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण व जमिनीचे तपशीलदेखील अद्ययावत करण्यात कृषी व महसूल यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे त्यांना सतरावा हप्ता मिळण्यात अडचण येणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT