Solapur News : ‘‘जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत जाणार असल्याने सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी टंचाई निर्माण होणाऱ्या प्रत्येक गावात नागरिकांना पिण्यासाठी पाणी तसेच जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून ठेवावे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी (ता. २०) केले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत श्री. आशीर्वाद बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपस्थित होते.
श्री. आशीर्वाद म्हणाले, ‘‘टंचाईच्या उपाययोजना राबवीत असताना ग्रामीण-शहरी भागात टँकर सुरू करण्याची मागणी आल्यावर त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सर्व बाबींची पडताळणी करून त्या ठिकाणी त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा. पाण्यासाठी टँकर किती सुरू करावेत, याबाबत कोणतीही अडचण नाही, परंतु टँकरची मागणी आल्यानंतर त्या ठिकाणी टँकरची किती प्रमाणात आवश्यकता आहे, याची खात्री करूनच ते सुरू करावेत.’’
‘‘सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी टंचाई उपाययोजना अत्यंत परिणामकारकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा,’’ असे निर्देश श्री. आशीर्वाद यांनी दिले.
दुष्काळाच्या अनुदानाचा आढावा
निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी खरीप अनुदान व दुष्काळाच्या अनुषंगाने तालुकानिहाय आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच खरीप अनुदानाच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी राहिलेले आहे. त्यांचे ई केवायसी तत्काळ करून घेण्याबाबत तहसीलदारांना निर्देश दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.