Avkali Paus Pik Kalaji: अवकाळी पावसाचा उस पिकावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होतो. अचानक पडणारा पाऊस आणि वादळी वारे यामुळे उसाची पाने फाटतात तर उभे पीक लोळते आणि उसाचे पेरे मोडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळीच पिकाची अवस्था पाहून योग्य निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावे. यासाठी पिकाचे वय, त्यावर झालेला परिणाम पाहणे आवश्यक आहे.
सतत पावसामुळे शेतात पाणी साचून राहते, माती चिखलमय होते आणि मुळांना हवा मिळत नाही. अशा परिस्थितीत मुळांची वाढ खुंटते व कुजण्याची शक्यता वाढते. परिणामी पिकाची वाढ मंदावते किंवा काही वेळेस झाडे सुकू शकतात.
जास्त ओलाव्यामुळे उसातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे साखर उतारा घटतो आणि कारखान्यात उसाला कमी दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
तसेच, पोंग्यात पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. विशेषतः ‘पोक्का बोइंग’सारखे रोग उसामध्ये दिसून येतात. दमट हवामानामुळे किडींचाही प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे पिकाची गुणवत्ता घसरते.
मुळांची कार्यक्षमता घटल्याने पाणी व अन्नद्रव्ये शोषण योग्यप्रकारे होत नाही. तसेच बाष्पीभवन व प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावल्याचे दिसून येते.
वादळी पावसामुळे उसाच्या पानांवर आणि खोडावर जखमा होतात. या जखमांमधून रोगजंतू सहज प्रवेश करतात आणि संसर्ग वाढतो. परिणामी उत्पादन आणि दर्जा दोन्ही कमी होतात.
पूर्णतः बुडालेल्या उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित पाण्याचा शिरकाव झाल्याने उसाचा वाढणारा कोंब कुजतो व पांगश्या फुटतात.
अवकाळी पावसानंतर शेतातील साचलेले पाणी तात्काळ बाहेर काढावे, जेणेकरून मुळांना हवा मिळेल.
नुकताच लागवड केलेला सुरु ऊस सध्या ३ ते ४ महिन्याच्या आहे. या पिकाला गारपिटीने किंवा वादळी वाऱ्याने झोडपलं असेल आणि उसाच्या पिकाची पानं पूर्णपणे फाटली तर त्याची वाढ योग्यरीत्या होत नाही. त्यापेक्षा या पिकाची कापणी करुन जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करुन द्यावा. आणि त्या पिकाचा पुन्हा खोडवा घ्यावा.
९ ते १० महिन्यांचा आडसाली ऊस लोळलेला त्वरित सरळ करून बांधून घ्यावा, त्यामुळे पुढील नुकसान टाळता येते.
याशिवाय ७ ते ८ महिन्यांच्या उसाला पावसाचा फटका बसल्यास त्याला वाढवून लवकरात लवकर कापणी करुन गुऱ्हाळ किंवा रसवंतीला द्यावा, असा सल्ला ऊस पीक तज्ज्ञ डॉ. गणेश पवार यांनी दिला आहे.
ज्या ठिकाणी पाणी जास्त साचते, तिथे निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. तसेच पिकावर नियमित निरीक्षण ठेवून कीड व रोग दिसताच त्वरित उपाय करावेत.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार शिफारस केलेल्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. यामध्ये ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची आळवणी करून मुळं स्ट्राँग राहतील. तर पिकाची वाढ सुधारण्यासाठी हलकी खतांची मात्रा देणेही फायदेशीर ठरते. यासाठी जिवाणू खतांचा वापर करायचा आहे. जसे, मायकोरायझा, स्फुरद विरघळवणारे जिवाणू, पालाश विरघळवणारे जिवाणू यांची समावेश करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.