Agriculture
Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Economy : शेतीचे चक्रव्यूह कसे भेदणार?

Team Agrowon

सुशांत हिरालाल सुर्वे

कोरोना जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून पहिल्या 2 लाटेत (2 वर्ष) द्राक्ष इंडस्ट्री (Grape industry) पूर्णपणे कोलमडली. त्यानंतरील पुढील वर्ष हवामान (अवकाळी पाऊस) अंदाजने गेले.

तीन वर्षांच्या बॅकलॉग नंतर यावर्षी थोडे चांगले बाजारभाव द्राक्ष (Garpe) ला भेटले, पण त्याचा कालावधी हा थोडकाच होता.

ज्यावेळी बाजार वाढत होते, त्यावेळी शुगरचा प्रॉब्लेम अनेक बागांना होता, आवक कमी होती. आणि ज्यावेळी आवक वाढली त्यावेळी पुन्हा बाजार अवकाळी पाऊसमुळे (Unseasonal Rain) कमी आले.

परवा एक शेतकरी भेटले होते, चांगले प्रगतशील शेतकरी. वातावरण बदलाचा फटका त्यांच्याही बागेला बसला होता. चार लाख खर्च झाला आणि ऐंशी हजार उत्पन्न झाले म्हणे. कृषी दुकानदार फोन करतात उधारीला.

त्यांना देणे असते मार्च एन्डला, शेठने नाही फोन केला तरी कामावरचे मुले सारखे फोन करतात. शेवटी शेठला फोन करून सांगितले मला फोन करायला नका लावू, मी इतक्या वर्षात कधी पैसे देणे ठेवले नाही. मी पैसे देईल, पण सारखा सारखा फोन आला की खरच माझा बीपी वाढतो.

माझेकडे पैसे आले की, स्वतःहून जेवढे शक्य आहे तेवढे लगेच आणून देईल सांगितले. पण कृपया फोन करायला लावू नका. गावातील प्रगतशील शेतकरी व पूर्वानुभव मुळे, कृषी दुकानदाराने फोन करणे बंद केले. पण हे सर्वांच्याच बाबतीत होईल असेही नाही.

असे लाखो शेतकरी आहेत. शेती करताना अशी अनेक लोकांना देणेदारी देय असते. त्यात ट्रॅक्टरवाला, नर्सरी, ड्रीप-मल्चिंग, तार काठी, औषधे असे अनेक देणेदारी मागील तीन वर्षांपासून थकीत होत चालली आहे.

कृषी व्यावसायिकांना पण कंपनींकडून पैसे साठी तगादा असतो, म्हणून त्यांनाही मार्केट मधून पैसे गोळा करणे गरजेचेच असते.

दुकानदारांनाही औषधें देताना वाटते की, आता यांचे पीक गेले का येतील आपले पैसे. पण जेव्हा आपल्यासमोर एखादा शेतकरी बाजारभावअभावी कोबी फ्लॉवरला रोटर मारून टाकतो, कांदे एकदम कमी भावात विकतो.

त्यावेळी उधारी जमा करणे अवघड आहे हे त्यांच्याही लक्षात येते, पण मल्टीनॅशनल औषधी-खते कंपनीना, पिकांचा लागवड सिझन चालू झाला की पीक वाढीच्या वेळेत मोठा सेल हवा असतो आणि नंतर बाजार पडले, शेतकऱ्यांकडे पैसे आले नाही.

मार्केटमध्ये कितीही बिकट परिस्थिती असली तरी त्यांना वेळेत त्यांचा पैसा परत हवा असतो. हे चक्रव्यूह तसं, समजायला आणि समजून घ्यायला पण फार अवघड आहे.

मागील 3 वर्षांपासून या चक्रव्यूहाचे फेरे वाढतच आहे. पण आता हे चक्रव्युह भेदल्याशिवाय पर्याय नाही.पीक पॅटर्न बदलणे, पीक उत्पादन खर्च कमी करणे- त्यासाठी एकत्रित येऊन निविष्ठा खरेदी करणे असेल, चर्चा-मार्गदर्शन असेल, बचतगट इत्यादी माध्यमातून निधी उभारणे असेल, एकत्रित येऊन- गट कंपनी स्थापना करून शासकीय योजनांचा फायदा घेत पीक प्रक्रिया-काढणीपश्चात प्रक्रिया,विक्री यंत्रणा उभारणे, स्वतःचा उत्पादनांचा एकत्रीत येऊन एखादा ब्रँड बनवणे, त्याची गुणवत्ता जपत आपल्या उत्पादनांचा फिक्स बाजारभाव ठेवत एक विशेष ग्राहकवर्ग निर्माण करणे, त्यातून बाजारभाव व उत्पन्नाची शाश्वती निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

आज अनेक ठिकाणी हे होत आहे. पण नावाला हजार लोकांची कंपनी आणि फायदा फक्त 8-10 लोकांना हे ही नको. आपण एखाद्या एकत्रित कुटुंबाचे सदस्य असल्यावर, आपल्या चढ उतारात त्यांची सोबत असते. आपल्याला मानसिक-आर्थिक पाठिंबा असतो.

सर्वजण कुटुंबाच्या व त्यातून कुटुंबातील प्रत्येकाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करत असतात. अशाच पद्धतीने चालणाऱ्या गटांची-कंपनींची स्थापना होणे गरजेचे आहे. अशा काही कंपनीची उदाहरणे आपल्यासमोर असतील, तर त्यांचे देखील मार्गदर्शन घेणे योग्य आहे.

एकट्याने शेती करणे, किंवा शेतीसाठी भांडवल उभारणे, शेतमाल विक्री करणे आता दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

एकट्यापेक्षा समूहाला अधिक ताकत असते, समूहाचा दबाव असतो, त्याचा आवाज मोठ्या पातळीपर्यंत पोहचू शकतो. त्याची दखल घेतली जाते. समूहाच्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येऊ शकतात, व यातून हे चक्रव्यूह भेदले जाऊ शकते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी कधी नव्हे ते एकत्रित येत आहेत, एकमेकांचे अनुभव सांगत एकमेकांना मदत करत आहेत, एकमेकांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करत आहेत. एखादा कार्यक्रम असेल तर जबाबदारी वाटून घेत आहेत.

आपल्या समूहाला पुढे नेण्यासाठी कोण मदत करू शकेल अशा प्रत्येकासोबत कनेक्ट होऊन त्यांची मदत घेत आहेत. समूह कसा पुढे जाईल, व त्यातून सदस्यांचा सर्वोतोपरी कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत.

एखादी कंपनी चालवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी जे काही आवश्यक असतं त्या सर्व पायऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित आलेले समूह करत आहेत. आमचे डाळिंब शेतीमध्ये अनेक युवा शेतकरी एकत्रित येत, एकमेकांची मदत करत पुढे जात आहेत.

आता यातील काही समूहांनीच वरील पद्धतीत शेतीबरोबर एक पाऊल पुढे टाकून अन्य लोकांसाठी दीपस्तंभ होणे गरजेचे आहे. हे थोडे अवघड वाटत असले तरी अशक्य नाही, आज जे यशस्वी आहेत त्यांनी इतरांना हात दिला तर हे सहज शक्य होईल. व शेतीचे भोवती वाढत चाललेलं हे चक्रव्यूह भेदता येईल.

(लेखक डाळिंब शेती मार्गदर्शक, संगमनेर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : पारोळा, अमळनेर, जामनेरात पाणी टंचाईची समस्या वाढली

Gadhinglaj Sugar Factory : 'गडहिंग्लज साखर कारखान्याची चौकशी करून प्रशासक नेमा'

Bharari Pathak : बियाणे, खते तपासणीसाठी १५ भरारी पथके

Onion Rate : मोदींना कांदा प्रश्नांवर बोलेन; छगन भुजबळ यांचं कांदा उत्पादकांना आश्वासन!

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचे वातावरण ; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज 

SCROLL FOR NEXT