Lasalgaon Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Lasalgaon Onion Market: लासलगावच्या कांद्याची ओळख जगभर कशी पोहचली?

नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामातील उत्पादित उन्हाळ कांद्याची चव, रंग, वास व आकार यात एक वेगळेपण आहे. प्रामुख्याने लासलगाव (ता.निफाड)च्या ४० किलोमीटर परिसरात हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

मुकूंद पिंगळे

Lasalgaon Onion Market नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामातील उत्पादित उन्हाळ कांद्याची (Summer Onion) चव, रंग, वास व आकार यात एक वेगळेपण आहे. प्रामुख्याने लासलगाव (ता.निफाड)च्या ४० किलोमीटर परिसरात हे उत्पादन (Onion Production) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

यामुळेच कांदासंबंधी संशोधन,विपणन, रोजगाराचा (Employment) केंद्रबिंदू हा परिसर आहे. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे २०१६ साली येथील कांद्याला ‘लासलगाव कांदा’ (Lasalgoan Onion) असे भौगोलिक चिन्हांकन मिळाले आहे. त्यामुळे येथील कांद्याला जगभरात वेगळी ओळख मिळाली आहे.

लासलगाव परिसराची कांदा उत्पादनात देशात आघाडी:

संतांच्या अभंगापासून तर साहित्यात, आयुर्वेदापासून तर आहारात, अर्थकारणापासून ते राजकारणापर्यंत असा कांद्याचा संदर्भ आढळतो. कांदा जसा आहारात महत्वाचा आहे. तसा उत्तम औषधी व श्रेष्ठ रसायन म्हणूनही लोकप्रिय आहे.

अतिप्राचीन काळी ‘चरक संहिता’, ‘सुश्रुत संहिता’ या वैद्यक शास्त्रातील महत्वपूर्ण ग्रंथामध्ये कांद्याचा उल्लेख व महत्व स्पष्ट होते. बहुगुणी अशा प्रकारचे हे पिक आहे. अभ्यासकांच्या मते,कांद्याचा मूळ इतिहास हा इराण,अफगाणिस्थानातून सुरु होतो.

मात्र कांदा आता भारतीय शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा भाग बनला आहे. देशभरात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरातील रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा ग्राहकांच्या पसंदीस उतरतो. तो येथील शेतकऱ्यांसाठी ‘सोनं’ मानला जातो.

हे पिक देशाच्या अर्थकारणाच्या चर्चेत असते, तर कधी राजकारणाच्या कोंडीचा भाग ठरते. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर लासलगाव परिसर आणि कांदा असे ओळखीचे समीकरण बनले आहे.

मानवी आहारात मागणी वाढल्याने कांदा व्‍यापारीदृष्‍टया महत्‍वाचे भाजीपाला पिक झाले. तीन ते चार महिन्यांत काढणीला व कमी खर्चात येणारे हे नगदी पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा असतो. ते कधी हसवते तर कधी रडवते.

मात्र तरीही शेतकरी पाण्याचा अंदाज घेऊन लागवडी करतच असतात. कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण उत्‍पादनापैकी ३७ टक्‍के तर भारतातील १० टक्‍के कांद्याचे उत्‍पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.

प्रामुख्याने निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा, मालेगाव, कळवण व सटाणा परिसरात त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यात लासलगाव परिसर आघाडीवर असतो.

अनेक पिढ्यांपासून उत्पादनाची परंपरा:

लासलगाव परिसरात गेल्या अनेक पिढ्यांपासून कांदा उत्पादन घेत असल्याबाबत संदर्भ मिळतात. पूर्वी लागवड क्षेत्र कमी होते; मात्र ते गेल्या ६० वर्षात वाढत गेले आहे. कांदा उत्पादन येथे होत असल्याने ब्रिटीशकालीन कांदा संशोधन केंद्रही याच भागात होते.

तर सध्या नाफेड, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थाचे कामकाज याच कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे कांद्यासाठी देशातील मुख्य केंद्र लासलगाव मानले जाते.

साहजिकच कांद्याची बाजारपेठ येथे उभी राहिली. अन म्हणता म्हणता देशभरात कांदा खरेदी-विक्रीची बेंचमार्क बनली. त्यामुळे व्यापाऱ्यांसह निर्यातदार,शासकीय कांदा खरेदी करणाऱ्या संस्था यांची पहिली पसंदी आजवर लासलगावलाच राहिलेली आहे.

म्हणूनच कांद्याला मिळाले भौगोलिक मानांकन.....

चव, रंग, वास व टिकवणक्षमता या सर्व पातळ्यांवर येथील कांदा नेहमीच सरस राहिला आहे. तो निफाड लाल व नाशिक लाल या नावाने लोकप्रिय आहे. रब्बी हंगामात ऑक्टोबर ते मार्च असा या पिकाचा कालावधी असतो.

येथील मातीत गंधकाचे प्रमाण अधिक असल्याने उग्र वास आणि चवीला अधिक तिखट चव अशी वैशिष्ट्ये कांद्याची आहेत. हलका लालसर यासह तुलनेत आकाराने मोठा असतो. त्याचा आकार ४ ते ६ सेमी व्यास असतो.

यासह कांद्यावर १६ ते १७ टरफले (आवरणे) असतात. हे या कांद्याचे गुणवैशिष्ट्य आहे.त्यामुळे कांद्याची टिकवणक्षमता ८ ते ९ महिने असते. ज्यामध्ये विटामिन बी-२, सी, खनिजे, कॅल्शिअम व फेरसचे प्रमाणही त्यात आढळते.

औषधी गुणधर्म असल्याने मागणीच्या अनुषंगाने त्यास पसंदी मिळत असते. उच्च साठवणूक क्षमतेमुळे पारंपारिक पद्धतीने तो कांदा चाळीमध्ये साठवला जातो. त्यामुळे राष्ट्रीयस्तरावर वेगळेपण सिद्ध झाले आहे.

येथील कांद्याला भौगोलिक चिन्हांकन मिळण्यासाठी लासलगाव येथील बळीराजा शेतकरी गटाने जुने संदर्भ, कांद्याचे वेगळेपण, गुणधर्म संकलित करून प्रस्ताव पाठविला होता. याकामी प्रा.गणेश हिंगमिरे यांचे सहकार्य लाभले होते.

पाठपुरावा पूर्ण झाल्यानंतर इतर कांद्याच्या तुलनेत लासलगाव कांद्यालाच भौगोलिक चिन्हांकन का द्यावे असा प्रश्न दिल्ली येथील भौगोलिक चिन्हांकन नोंदणी बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावेळी गटाच्या सदस्याने टेबलवरच कांदा फोडला.

अन ‘कांद्याचा वास घ्या, असा वास व तिखटपणा इतर कांद्यात आहे का? असा दावा केल्यानंतर अखेर समितीने वेगळेपण अभ्यासून भौगोलिक चिन्हांकनाची मोहोर उमटविली, असे गटाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगतात.

येथील कांद्याचा प्रचार, प्रसार, मार्केटिंग, प्रक्रियासंधी यासाठी हे प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळे कांदा म्हंटल कि, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक, पत्रकार, धोरणकर्ते अन राजकारणी येथे येऊन भेटी देऊन अभ्यास करतात.

अन संधी निर्माणझाल्या.....

जेष्ठ कांदा पिक शास्त्रज्ञ डॉ.सतीश भोंडे सांगतात, कांदा पिकात अनेक संशोधने झाली. नवे वाण विकसित आले; मात्र तरीही येथील कांद्याचे वेगळेपण कायम अधोरेखित आहे.

देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातमोठी मागणी असल्याने पुरवठा होतो. मसाले, सॉस, केचअप, चटणी अशी प्रक्रियायुक्त उत्पादने तसेच कांदा चकली व वाळलेल्या कांदा भुकटीला मोठी मागणी असल्याने त्यासंबंधित उद्योग उभे राहत आहेत.

आजमितीला देशभर २२ राज्यात कांदा पिकतो, मात्र ओळख या ‘लासलगाव’ने दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रक्रियासंबंधी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेत कांदा पिकाची निवड करण्यात आली आहे. ‘अपेडा’च्या पिक उत्पादन क्लस्टरमध्ये जिल्ह्यातील कांद्याचा समावेश आहे.

पूर्व आशियामध्ये नाशिक हा मुख्य कांदा उत्पादक केंद्र आहे. कांद्याची सर्वाधिक आवक होत असल्याने आशिया खंडातील सर्वात मोठी लासलगांव बाजार समिती ओळखली जाते. हे श्रेय शेतकऱ्यांना द्यावे लागेल.

आशिया खंडात कांदा बाजाराचा नावलौकिक:

स्वातंत्रपूर्व काळात महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा तीव्र होऊ लागला. त्यावेळी शेतकरी राजकीय प्रक्रियेत येत होते. शेतीमाल विक्रीच्या अनुषंगाने येथे स्वर्गीय बळवंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिल १९४७ रोजी बाजार समितीची स्थापना झाली.

१ मे १९४७ रोजी प्रत्यक्ष कामकाज सुरु झाल्यानंतर शेंगा, गुळ यासाठी हि बाजारपेठ प्रसिद्ध होती. मात्र आता एकूण शेतमाल आवकेच्या तुलनेत ९० टक्के कांद्याची आवक होते. त्यामुळे येथे स्वतंत्र कांदा आवार बनविण्यात आला आहे.

पूर्वी १ एप्रिल १९४७ ते ३१ मार्च १९८२ पर्यंत लासलगांव बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे निफाड व चांदवड तालुका होते. कालांतराने तालुकानिहाय दोन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन झाल्या.

तर पुढे कामकाज वाढल्याने २८ डिसेंबर १९९५ ला लासलगांव बाजार समितीचे विभाजन होऊन पिंपळगांव बसवंत हि स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्यात आली.

त्यामुळे आजमितीला लासलगाव मुख्य बाजार आवारासह विंचूर व निफाड असे दोन बाजार आवार सुरु आहेत.

तर याच परिसरात पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गेल्या काही वर्षात विक्रमी आवक होत आहे. मुख्य बाजार आवरासह सायखेडा उपबाजार आवार आहे.

त्यामुळे हंगामात बाजार आवार कांद्याच्या वाहनांनी भरलेला दिसतो. येथील बाजार समित्यांचे वैशिष्ट्य म्हणजे विक्री मोकळ्या स्वरूपात व उघड लिलाव पद्धतीने होते.

कमी पाऊस, पोषक हवामान, जमिनीची उत्तम प्रत असल्याने निर्यातयोग्य उत्पादन असल्याने ७० टक्के कांदा 'लासलगांवचा कांदा' म्हणून निर्यात होतो.

माल वाहतुकीसाठी रेल्वेची सुविधा जवळच आहे. मुख्य प्रभावक्षेत्रात कांद्यामुळे तीन बाजार समित्या निर्माण झाल्या. कांदा उत्पादनपश्चात शेतमाल पुरवठा सोईचे असल्याने अनेक कांदा निर्यातदार-खरेदीदार येथे कांदा खरेदीस पसंती देतात.

याशिवाय परिसरात येवला बाजार समिती मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार, उमराणे, देवळा, सटाणा, कळवण, नामपूर, नांदगाव, मनमाड, मुंगसे या बाजार समितीत आवक होत असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT