Alibaug News : रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने रायगडमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. पोलादपूर, महाड, तळा, म्हसळा या तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपले. अतिवृष्टीमुळे शाळा, महाविद्यालयांना सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर करण्यात आली होती.
जिल्ह्यातील बहुतांश नद्या तुडूंब वाहत असून हवामान विभागाने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
नागरी वस्तीत शिरलेल्या पाण्यामुळे अलिबाग तालुक्यातील मल्याण, रामराज, नेहुली येथील नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबई- गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत डोंगरावरील माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.
जिल्ह्यातून वाहणाऱ्या सावित्री, काळ, अंबा, पाताळगंगा या नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सावधानतेचा इशारा दिला आहे. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.
भात लागवडीत खंड
मुसळधार पावसाने खाचरात पाणी साचल्याने भातलावणी करण्यासाठी सकाळीच निघालेल्या लोकांना परत यावे लागले. समुद्रकिनाऱ्यालगतच्या भातशेतीमध्ये पाणी ओसलेच नाही. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने भाताची रोपे पाण्याखाली राहिल्याने कुजण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
‘पाणी ओसरताच पंचनामे करा’
जिल्हात भात लावणीच्या कामांना वेग येत असतानात सुरू मुसळधार पावसाने कामामध्ये अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार पाणी ओसरताच शेती आणि घरांचे नुकसान झालेले असल्यास पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.