Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसाने जळगावात मोठी हानी

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पावसाने जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. केळी, मका, गहू व अन्य पिकांची हानी झाली असून, जामनेर, बोदवड भागांत अधिकचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. तीन हजार ४११ हेक्टरवर नुकसानीची माहिती प्रशासनाने दिली आहे. जामनेर तालुक्याला तुफान वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले.

या अवकाळी पावसामुळे शेतामधील उभी केळी तर आडवी झालीच शिवाय लिंबूसह मका, ज्वारी, गहू आदी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. सोबतच काहींच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंसह अन्य सामानही ओलेचिंब झाले आहे. खडकी-बोरगाव, महुखेडा, लोणी, आमखेडा, सावरला, तळेगाव आदी गावांना पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

ग्रामविकास तथा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने खडकी-बोरगाव परिसर आणि तळेगाव- आमखेडा, गारखेडा परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी तहसीलदार नानासाहेब आगळेंसह अधिकारीवर्ग उपस्थित होता.

या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मंत्री महाजनांनी अधिकाऱ्यांना दिले. या झालेल्या नुकसानीची राज्य शासनाने दखल घेतली असून, पीडितांना आवश्यक सर्व ती मदत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्‍वासनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

बोदवडला तडाखा

जळगाव जिल्ह्यात बोदवड तालुक्यातही वादळी पावसाचा फटका बसला आहे. बोदवड शहरात जय मातादी जीनिंग प्रेसिंगचे शेड उडाल्याने दीड हजार क्विंटल कपाशी, तर हजार, बाराशे क्विंटल सरकीचे नुकसान झाले. तसेच जलचक्र परिसरातही वादळी तडाखा बसला आहे. येथे जिल्हा परिषद शाळेचे सर्व पत्रे उडाली. तसेच शहरात अण्णा भाऊ साठेनगरमध्ये अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली, भिंती कोसळल्या असून, घरांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

जलचक्र बुद्रुक, खुर्द व जलचक्र तांडा येथे वादळी वाऱ्यामुळे गावात खूप नुकसान झाले आहे. गावात झाडे व वीज खांब तुटलेले आहेत. दिनकर ठाकरे, दामू शिराळे, आनंद सुरवाडे, सतीश पाटील, बेबाबाई खराटे, राजू पाटील, सतीश ठाकरे, सुशील पाटील, विठ्ठल पाटील यांच्या घरांवरील पत्रे उडून घराच्या भिंतीचे नुकसान झाले आहे. तसेच विनोद सपकाळ, सुरेश सपकाळ आणि गणेश सपकाळ, सरला पाटील यांचे तीळ पीक, नलिनीबाई पाटील यांची ज्वारी, साहेबराव पाटील (जलचक्र) व निंबाजी बावस्कर यांचे ज्वारी पिकांसह अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे ऐणगाव येथे घरांच्या नुकसानासह विनोद कोळी यांचा मका, ज्वारी, जुनोना येथे केळीबाग यांसह इतरही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. हरणखेड येथे प्रफुल्ल वराडे याची पंधरा ते २० क्विंटल कपाशी वीज कोसळल्याने जळाली. यांसह मका, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने व वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. आता वीजतारा जोडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. या अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी तहसीलदार अनिल वाणी यांनी केली व बुधवारी पंचनामे करण्यात येतील, असे सांगितले.

धुळ्यातही चिंता

धुळ्यातही अनेक भागात ढगाळ आणि पावसाळी वातावरण आहे. पिकांची मळणी, कापणी सुरू असल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे. अनेक भागांत मागील काही दिवस सूर्यदेवाचेही दर्शन झाले नाही. अशात ढगाळ वातावरण कायम राहिले तर जी लहान पिके आहेत, त्यांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी भीती कृषी यंत्रणेने व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT