Palghar News : डहाणू परिसरातील शेतकरी भातपिकाच्या जोडीला बांधावर तूर लागवड करणे पसंत करत आहेत. यंदा खरीप हंगामात लागवड केलेल्या हळव्या जातीच्या तुरी कापून खळ्यावर झोडणीदेखील करण्यात आली आहे. गरव्या जातीच्या तुरी या सध्या फुलोरा अवस्थेतून दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत.
भातपिकाची कापणी पूर्ण झाल्यानंतरही रब्बीमध्ये अन्य कडधान्यवर्गीय पिके घेतली जातात. खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या गरव्या जातीच्या तुरी साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये परिपक्व होऊन त्याची खळ्यावर झोडणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न आणि गरव्या जातीच्या बांधावरील तुरीपासून मिळणारे उत्पन्न अशा दुहेरी उत्पन्नाचा फायदा होत आहे, असे डहाणू कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
तुरीच्या हिरव्या कोवळ्या शेंगांना बाजारात ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात पोपटी पार्टीचे बेत करण्यात येत आहेत. पोपटीमध्ये तुरीच्या शेंगा टाकून स्वाद घेण्याचा आनंद खवय्ये लुटत आहेत. तुरीच्या शेंगा उकडून खाण्यासाठी ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. भाजी करण्यासाठी हिरव्या कोवळ्या तुरीच्या शेंगांना पसंती मिळत आहे.
बांधावर तूर लागवड फायदेशीर
बदलते हवामान, पावसाची अनियमितता यामुळे खरीप हंगामातील भातपिकात शेतकरी नुकसान सोसत आहे. नुकसानीची कमतरता कमी व्हावी आणि अतिरिक्त उत्पादन आणि उत्पन्न मिळावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीची योजना कार्यरत असून, त्याचा फायदा झाल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे.
कुपोषणमुक्तीसाठी हातभार
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी भाताबरोबर तूर बियाण्यांचे वाटप कृषी विभागामार्फत झाले आहे. परिणामी तूर लागवड क्षेत्र वाढले. रोजच्या आहारात मुबलक प्रमाणात प्रथिनांचा स्रोत असलेल्या कडधान्याचा समावेश झाल्याने आदिवासी भागातील कुपोषणमुक्तीसाठी बांधावरील तूर लागवड योजनेचा फायदा होईल, असे मत उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी व्यक्त केले.
सध्या तुरीच्या हिरव्या शेंगांचा बहर असून, त्या विकूनही चांगले उत्पन्न मिळत आहे. कोवळ्या तुरीच्या शेंगांना अर्ध्या किलोला ५० रुपये भाव मिळतो. तुरीचे पीक बांधावर असल्याने बांधही सुस्थितीत आहेत. उत्पादन हे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मिळत असल्याने रब्बीतील पीक आणि गरवी तुरी असे दुहेरी उत्पन्न मिळण्यास मदत होते.- समू बुजड, तूर उत्पादक शेतकरी, खूनवडे
डहाणू तालुक्यात ६०० एकरवर तुरीची लागवड करण्यात आली. भातखाचरात खेकड्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने, तसेच पूरस्थिती निर्माण झाल्यास बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तुरीची मुळे खोलवर जात असल्याने खेकड्यांचा आणि पूरस्थितीत बांध फुटण्याचा धोका टळू शकेल.- किशोरी विशे, कृषी विभाग, डहाणू
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.