Kolhapur News: यंदाचा हंगाम ऊस उत्पादकांबरोबर कारखान्यांचीही परीक्षा पाहणारा ठरला आहे. अनेक कारखान्यांना यंदाची एफआरपी वेळेत देणे शक्य झाले नाही. राज्याचा हंगाम पूर्ण झाला तरीही राज्यातील तब्बल पन्नास टक्के कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली नसल्याचे चित्र आहे. हंगाम घेतलेल्या २०० साखर कारखान्यांपैकी अजूनही ९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काची पूर्ण एफआरपी देण्यास असमर्थता दाखवली आहे. १०५ कारखान्यांनी शंभर टक्के रक्कम दिली आहे.
‘एफआरपी’च्या ८० ते ९९ टक्के रक्कम ५० कारखान्यांनी दिली आहे. ६० ते ८० टक्के रक्कम ३१ साखर कारखान्यांनी अदा केली आहे. १४ कारखान्यांनी एफआरपीच्या केवळ ५९ टक्क्यांपर्यंत रक्कम दिली आहे. कारखान्यांनी एफआरपीची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याची गंभीर नोंद साखर आयुक्तालयाने घेतली आहे. साखर आयुक्तालयाने राज्यातील १५ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.
सर्वाधिक नऊ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील असून, धाराशिव एक, अहिल्यानगर व सातारामधील प्रत्येकी दोन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील एका कारखान्याचा समावेश आहे. जप्तीच्या कारवाईमध्ये १२ खासगी आणि तीन सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध शेतकरी संघटनांनी या बाबत आंदोलन केले होते. थकित एफआरपी रक्कमेवर १५ टक्के दराने देय होणारे व्याज या रक्कमा या कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनांची विक्री करून त्यामधून ही रक्कम वसूल करण्यात यावी.
साखर साठा बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून या मालमत्तेवर दस्तऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद घ्यावी. या मालमत्तेची जप्ती विहित पद्धतीने विक्री करून या रक्कमेतून ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार देयबाकी रक्कमेची खात्री करून संबंधितांना विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
यंदा २०० साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व कारखान्यांनी हंगाम समाप्त केली. मार्चच्या पहिल्या सप्ताहापासून साखर कारखाने बंद होण्यास प्रारंभ झाला. सर्वाधिक कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा उसाची मोठी चणचण भासली. यामुळे हा विभाग सर्वात प्रथम बंद झाला. उतारा व उत्पन्नात आघाडीवर असणाऱ्या कोल्हापूर विभागातही यंदा मरगळच होती. कधी एकदम उसाची आवक तर कधी एकदम उसाची कमतरता असे चित्र राहिले.
शेतकऱ्यांना २६,७९६ कोटी रुपये अदा
यंदा मार्चच्या पहिल्या पंधरवड्याअखेर ८४४ लाख टन उसाचे गाळप झाले. याची तोडणी वाहतूक खर्चासहीत एफआरपी २८,२३१ रुपये झाली. या पैकी २६,७९६ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. अजूनही १४३२ कोटी रुपयांची शेतकऱ्यांची थकबाकी कायम आहे. ९४ टक्के एफआरपीची रक्कम उत्पादकांना देण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.