K.Chandrasekhar Rao Agrowon
ॲग्रो विशेष

K.Chandrasekhar Rao : तेलंगानात राजकारण तापले? शेतकऱ्यांची नाराजी; माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेवर निशाना

Aslam Abdul Shanedivan

Pune News : तेलंगानात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसविरोधात सध्या शेतकरी नाराज झाले आहेत. सोमवारी (ता.१५) धान उत्पादक शेतकऱ्यांनी थेट आपली नाराजी व्यक्त करताना पोस्टकार्ड आंदोलन केले होते. तसेच या पोस्टकार्डमधून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना धान बोनसची आठवण करून देण्यात आली होती. यावरून येथील राजकारण आता चांगलेच तापले आहे. धान बोनस आणि शेतकऱ्यांचे पोस्टकार्ड आंदोलनावरून बीआरएस अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राव यांनी, 'तेलंगानात काँग्रेसचे काहीच दिवस उरले असून हे सरकार पडेल, असे म्हटले आहे. तसेच येत्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळणार नसून त्यांचे फक्त दोन आमदार येतील', असे देखील म्हटले आहे. ही टीका राव यांनी मंगळवारी (ता. १६) मेडक सुलतानपूर येथील आयोजित प्रजा आशीर्वाद सभेला संभोधित करताना केली.

...तर आश्चर्य वाटायला नको

'एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार काँग्रेसविरोधात शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये संताप आहे. तर भाजपमध्ये होणाऱ्या पक्ष प्रवेशामुळे मुख्यमंत्री रेड्डी चिडचिडे झाले आहेत. आमची इच्छा होती की राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा. मात्र अलिकडच्या काळातील वक्तव्यांमुळे काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांच्या अस्तित्वावर शंका निर्माण होत आहे. सध्याची स्थिती पाहता भाजपबरोबर काँग्रेमधील किती जातील आणि किती राहतील याचा काही भरोसा नाही. तर येत्या काळात मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि निष्ठा बदलली तर आश्चर्य वाटायला नको', असा टोला राव यांनी लगावला आहे.

५०० रुपयांच्या बोनस मुद्द्याची आठवण

राव यांनी, रयथू बंधू योजना आणि धानासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये बोनस यासह शेतकऱ्यांना दिलेली प्रमुख आश्वासनावरून काँग्रेसला घेरले. तसेच सिद्धीपेठ मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उचलला. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना कर्जमाफी, एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई आणि धानासाठी ५०० रुपयांच्या बोनस मुद्द्याची आठवण करून देण्यात आली.

आयोगाकडे तक्रार करणार नाही

यावरून, 'शेतकऱ्यांचे हाल पाहता राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये बोनस द्यावे. आचारसंहीता सुरू असल्याने याबाबत सरकारने आदेश काढवा आणि निवडणुकीनंतर बोनस द्यावा. याबाबत निवडणूक आयोगाकडे कोणतीही तक्रार करणार नाही' असे आश्वासन मी मुख्यमंत्र्यांना देतो. पण 'जोपर्यंत धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळत नाही. तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही, असा इशारा राव यांनी दिला आहे.

भाजप म्हणजे निरुपयोगी नातेवाईक

तसेच राव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना, भाजपची तुलना तेलंगणा आणि तेथील लोकांसाठी कोणतेही योगदान न देणाऱ्या “निरुपयोगी लोकांशी” केली. राज्याच्या प्रगतीसाठी तरुणांनी हुशारीने मतदान करताना उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्याचे हित होणार नाही अशा प्रकारच्या भाषणबाजीत सहभागी होऊ नये, असे देखील आवाहन राव यांनी जनतेला केले.

शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

दरम्यान सोमवारी काँग्रेसविरोधात सिद्धीपेठ मतदारसंघातील शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या ज्युबली हिल्स निवासस्थानी पोस्टकार्ड आंदोलन करताना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना सरकारच्या अनेक मुद्द्यांची आठवून करून दिली. तसेच सरकारने दिलेली कोणतीच आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली होती.

सरकारच्या उदासिनतेचा निषेध करण्यासाठी सध्या दुसरा पर्याय उरलेला नाही. यामुळे पोस्टकार्ड मोहीम सुरू करण्यात आल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले होते. तर यातून पाण्याअभावी शेतकऱ्यांची होणारी दुर्दशा पोस्टकार्डद्वारे वाचून मुख्यमंत्र्यांना कळेल, असेही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.

शेतकऱ्यांच्या मागण्या

तसेच मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाप्रमाणे १५ हजार रुपयांची आर्थिक मदत त्वरित द्यावी, धानाला प्रति क्विंटल ५०० रुपये बोनस द्यावा, २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करावे आणि मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रयथू विमा अंतर्गत आर्थिक मदत करावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT