Nashik News : वडेखुर्द (ता.बागलाण) येथील शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक वेळा तक्रारी करूनही वनविभागाने वेळेवर कारवाई केली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. अखेर स्थानिक ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यामुळे वनविभागाने हालचाल करत आठ दिवसांपूर्वी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता.
सोमवार (ता.२८) रोजी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून, ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. बिबट्याने गेल्या काही आठवड्यांमध्ये परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत त्यांना फस्त केले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
ग्रामस्थांनी ताहराबाद वनविभागाकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. परिस्थितीच्या गांभीर्याची दखल घेत गटग्रामपंचायत श्रीपूरवडे यांनी थेट वनविभागाशी पत्रव्यवहार केला. यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी ज्ञानेश्वर शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बापू दिलीप अहिरे यांच्या शेतात (गट क्रमांक १५१) पिंजरा लावण्यात आला.
आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवार (ता.२८) पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे आढळले. ही माहिती समजताच ग्रामस्थांनी सरपंच जितेंद्र सूर्यवंशी यांना कळवले. त्यांनी तातडीने ताहाराबाद वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
लगेचच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे ताहाराबाद वनविभागाच्या आवारात हलवले. ग्रामस्थांनी वनविभागाच्या या कारवाईचे स्वागत केले असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून शिवारातील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याची मागणी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.