Sangli News : दिघंची परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. माणगंगा नदी कोरडी पडली असून, परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. त्यामुळे दिघंची भागाला वरदायी ठरणारा यादव वस्ती बंधारा टेंभूच्या पाण्याने भरून द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्याने फळ पिके, रब्बी हंगामातील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या वर्षी शासनाने आटपाडी तालुका दुष्काळ म्हणून जाहीर केलेला आहे. पाणी हवे असले तर पाणीपट्टी भरा असा तगादा पाटबंधारे विभागाने लावला आहे.
मात्र खरीप हंगाम वाया गेल्याने पाणीपट्टी कशी भरणार, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाच्या टंचाई निधीतून शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
दिघंजी गावालगत माणगंगा नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यात टेंभूचे पाणी येत असून या बंधाऱ्याच्या लाभ क्षेत्रात २४५ हेक्टर शेती ओलिताखाली येते. टेंभूचे आवर्तन सुरू असून आटपाडी तालुक्यात योजनेचे पाणी दाखलही झाले आहे. मात्र, या तलावात अद्यापही टेंभूचे पाणी सोडण्यात आले नसल्याने २४५ हेक्टरवरील शेती पाण्याविना धोक्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादव वस्ती बंधारा टेंभूच्या पाण्याने भरून देण्याची मागणी दिघंजी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बंधाऱ्याची वैशिष्ट्ये
सिंचन क्षमता २४५ हेक्टर
एकूण गाळे ४५
एकूण उंची ४.५ मीटर
प्रगल्पीय पाणीसाठा २१.१७ दलघनफूट
लोखंडी दारे ५७४
बंधाऱ्याची लांबी १७४ मीटर
आमची बंधऱ्याच्या काठाला शेती आहे. एप्रिल- मे मध्ये पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहेत. यासाठी टेंभू जलसिंचन योजनेतून हा बंधारा भरावा याबाबत वरिष्ठ अधिकारी रेडी साहेब यांच्याशी संपर्क झाला आहे.शहाजी यादव, शेतकरी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.