ॲग्रो विशेष

Agriculture Crisis: खरा संघर्ष आहे, सर्जक आणि भक्षक यांच्यात

अमर हबीब

भावांनो आणि बहिणींनो, काय चालले आहे आपल्या अवतीभोवती? त्यात नवे काय आहे? नवे म्हणजे काल नव्हते आणि आज आहे, असे काय काय आहे? त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत आहे. याचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण सामान्यपणे हाच साहित्याचा (Literature) विषय असतो.

पूर्वी कधीतरी कोठून कोणी आत्महत्या केल्याची खबर यायची. आज मात्र त्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, अशी बातमी शिवेच्या आत घडू शकते, उद्या कदाचित उंबऱ्याच्या आतदेखील, अशी भीती वाटावी असे झाले आहे.

‘शेती हे ज्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे तो शेतकरी,’ अशी शेतकरी या शब्दाची व्याख्या आहे. शेतकरी हवालदिल आहे. अस्मानी संकट आहेच.पण सुलतानी संकट त्याहून जास्त भयंकर आहे.

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांत शेतकरी सुखी झाला नाही. दु:ख वाढतच गेले. आज अनेक जण जीव देत आहेत व जे जीव देत नाहीत ते मरण जगत आहेत.

अनेकांना वाटते की हे गरिबीमुळे घडत आहे. वास्तविकता तशी नाही. भारतीय शेतकऱ्यांची दुर्दशा गुलामीमुळे झाली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न गुलामीचा आहे, हे अजून बऱ्याच लोकांना कळलेले नाही. सरकारला तर अजिबात नाही.

आपल्या देशातील सर्व समस्यांच्या तळाशी शेतकऱ्यांची गुलामी हे कारण आहे. ही गुलामी पिढ्यान्‌पिढ्यांची आहे. राजे बदलले की गुलामीचे स्वरूप बदलायचे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतरही गुलामी राहिली. फक्त स्वरूप बदलले. आता कायदे करून शेतकऱ्यांना गुलाम बनवले जाते.

सीलिंगचा कायदा, आवश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे आज शेतकऱ्यांचा गळफास बनले आहेत.

हे कायदे रद्द व्हावेत यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता तुम्ही या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून आणून बसविला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो.

जीवघेणे वर्तमान

शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अलीकडे दोन क्षेत्रांत खर्च वाढलेला दिसतो. एक आरोग्य आणि दुसरे शिक्षण. मध्यंतरी करोनाची साथ पसरली होती.

कुटुंबात कोणी आजारी पडले आणि त्याला दवाखान्यात नेले की कुटुंब-कारभाऱ्याचे कंबरडेच मोडते. हल्ली नवे नवेे आजार निघत आहेत आणि सामान्य माणसाला डॉक्टरचा खर्च पेलवण्याच्या पलीकडे गेला आहे.

गरिबांना आजारपणाची चैन परवडणारी नाही, हे बुजुर्गांचे म्हणणे पटू लागले आहे. वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्या आहेत. पण ते पेलण्याची कुवत शेतकऱ्यांमध्ये आली नाही.

शिक्षणाचे तर विचारूच नका. मुलामुलींना शिकविणे भाग आहे. मोकळे सोडता येत नाही. प्राथमिक शिक्षणाचे थोडेबहुत भागते. पण लेकरू आठवी-नववीला आले की खर्च सुरू होतो.

दहावी-बारावीला तो वाढतो आणि पुढचे शिक्षण तर विचारूच नका. मुलगा शिकून शहाणा होतो की नाही, हे पाहण्यापेक्षा त्याला मार्क किती पडतात हे पाहिले जाते. स्पर्धा जीवघेणी आहे.

आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च पेलण्याची कुवत शेतकऱ्यांची राहिलेली नाही. पण त्यांना हा खर्च करणे भाग पडत आहे. काही लोक आरोग्य आणि शिक्षण स्वस्त करावे, असा सल्ला देतात पण शेतकऱ्याची ऐपत वाढण्यासाठी लावलेले कुंपण नाहीसे करावे असे कोणी म्हणत नाही.

शेतकऱ्यांच्या पायात बेड्या कायम ठेवून होणाऱ्या सर्व सुधारणांचा लाभ बिगर शेतकऱ्यांनाच होतो, असे आपण पाहिले आहे.

आपल्या लहानपणी नव्हत्या अशा कोणकोणत्या गोष्टी आज व्यवहारात आल्या आहेत? असा विचार करून एक यादी करा म्हणजे तुम्हांला झालेले बदल लक्षात येतील.

आपल्या लहानपणी टीव्ही नव्हता, आज आहे; मोबाइलची आपण कल्पनासुद्धा केली नव्हती, आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. पूर्वी सरपण आणूनच स्वयंपाक केला जायचा.

आता घरोघरी गॅसच्या शेगड्या झाल्या आहेत. आपल्या कपड्यांची संख्या वाढली. मंदिराच्या दारातून होणाऱ्या चपलांच्या चोऱ्या थांबल्या. घरात प्लास्टिकचे भांडे नसायचे, आता ते आले आहे.

पॉलीथिन पिशव्या नावाची गोष्ट नव्हती. आता पदोपदी दिसते. मेलेल्या जनावरांच्या पोटात पॉलीथिन पिशव्या सापडल्या नाहीत असे घडत नाही.

बँका आल्या, पतपेढ्या आल्या, फायनान्स आले, ए.टी.एम. आले. मोट गेली, मोटार आली. शेतीत बैलांचा वापर कमी झाला.

नांगर गेले, ट्रॅक्टर आले. आमच्या लहानपणी भूईमूग घेतला जायचा. नंतर सूर्यफूल आले. कापूस आला. आता सोयाबीन घेतले जाते.

सोयाबीन काढायला माणसं मिळत नाहीत. माझ्या पिढीने गावरान वाण (घरचे बियाणे) वापरून शेती केली. त्या काळात अन्नाचा अभाव बघितला. अमेरिकेतून आलेली व तेथे म्हणे डुकरांना खाऊ घातली जाणारी मिलो आम्ही खाल्ली.

त्यानंतर आली संकरित बियाणे आणि रासायनिक खते. त्यांचा वापर केला. उत्पादन वाढले. दोनच्या ठिकाणी एकरी आठ पोते ज्वारी होऊ लागली. पण शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. उत्पादन वाढले, पण उत्पन्न वाढले नाही.

त्या वेळेस एक तोळा सोने घ्यायला एक क्विन्टल कापूस पुरायचा. आता पाच नव्हे दहा-दहा, वीस-वीस क्विंटल कापूस विकला तरी एक तोळा सोने घेता येत नाही. पैसे फार वाढले नाहीत पण पैशाची किंमत मात्र कमी झाली.

एका बाजूला परिस्थिती खूप बदलली आहे, कोणत्याच पिढीने एवढे बदल पाहिले नाहीत तेवढे बदल आपल्या पिढीने पाहिले आहेत.

सोयीसुविधा एवढ्या मुबलक झाल्या तरी आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च शेतकरी पेलू शकत नाहीत. हे वास्तव आपण समजून घेतले तर साहित्य आणि त्याची दिशा समजायला अडचण येणार नाही.

(बीड जिल्ह्यातील, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात 21 व 22 जानेवारी रोजी झालेल्या मृदगंध साहित्य संमेलनाचे संपादित अध्यक्षीय भाषण.)

सौजन्यः साप्ताहिक साधना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT