Pune News: गेल्या पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. त्याचा फळे व भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू लागला आहे. भाजीपाला पिके सुकू नये म्हणून शेतकऱ्यांची ओलितासाठी कसरत वाढली आहे. तापमान वाढीमुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे. परिणामी दरवाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अल्पभूधारक बागायतदार उन्हाची पर्वा न करता रब्बी हंगामातील पिके काढत आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, खेड, जुन्नर आणि आंबेगाव ही तालुके प्रामुख्याने भाजीपाला व फळभाज्यांसाठी ओळखली जातात. परंतु मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत असल्याने बाष्पीभवनातही वाढ होत आहे. प्रामुख्याने पुरंदर, शिरूर, इंदापूर, बारामती, खेड, पूर्व हवेली या भागाला अधिक झळ बसू लागली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट होत असल्याने बाजारपेठेत कमी आवक होत आहे.
त्यामुळे भाज्या दर वधारले आहेत. उन्हाळी भाजीपाला पिकाला पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी ओलीत केले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी वीज किंवा पाण्याची समस्या आहे तेथे दुपारी किंवा रात्रीही ओलित केले जात आहे. पाण्याची उपलब्धता आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला जसे भेंडी, गवार, चवळी, काकडी, टोमॅटो लागवड सुरू करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.
सध्या काही शेतकऱ्यांच्या शेतात वांगे, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला असून काही शेतकऱ्यांनी पेरू, डाळिंब, चिकू आदी फळबाग लागवड केली आहे. त्याचबरोबर भुईमूग, ऊस व भाजीपाला पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. या पिकांनाही उन्हाचा फटका बसत आहे. भाजीपाला व फळबाग अतिउष्णतेमुळे दुपारच्या वेळेस माना टाकत असून, काही ठिकाणी करपून जात आहे. त्यामुळे भाजीपाला, फळ लागवड केलेला शेतकरी संकटात आहे.
विंधन विहिरी कोरड्याठाक
पूर्व भागातील पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर परिसरातील मागील तीन महिन्यांपासून विहीर, बोअरवेल कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिकांना जगविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अतिउष्णतेमुळे पालेभाज्या तग धरणे कठीण झाले आहे. अनेकांच्या पालेभाज्या सुकून जात असल्याचे पुरंदर तालुक्यातील पिसे गावचे सरपंच रोहन मुळीक यांनी सांगितले
फळबागांना कसे वाचवाल?
सद्यःस्थितीत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ४० मायक्रॉनचे पॉलिथिन फळबागांसाठी मल्चिंग (आच्छादन) म्हणून वापरले आहे. काही ठिकाणी काडीकचरा, गव्हाचे कांड, भुसा, पालापाचोळा आदींचा वापर आच्छादन म्हणून केलेला आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा गढूळ, कचरायुक्त व क्षारयुक्त असल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात ठिबक संचामध्ये काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अतिजोखमीच्या गटातील नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच सध्या दहावीची परिक्षा, यात्रा, लग्न समारंभ असल्याने नागरिकांनी टोपी, उपरणे यांचा वापर करावा. यामध्ये उन्हात कष्टाची कामे करणारे, वृद्ध व्यक्ती, लहान बालके, मुले, स्थूल व्यक्ती, पुरेशी झोप गरजेची आहे.
सर्वाधिक तापमान असलेली केंद्रे
(स्रोत : हवामान विभाग)
तारीख केंद्र कमाल तापमान, अंश सेल्सिअसमध्ये
२५ फेब्रुवारी लोणावळा, शिरूर, कोरेगाव पार्क ३७.६
२४ फेब्रुवारी शिरूर ३७.४
२३ फेब्रुवारी लोणावळा ३७.९
२२ फेब्रुवारी तळेगाव ३८.७
२१ फेब्रुवारी शिरूर ३७.६
२० फेब्रुवारी लोणावळा ३७.५
१९ फेब्रुवारी शिरूर ३८.७
१२ फेब्रुवारी शिरूर ३८.८
११ फेब्रुवारी तळेगाव ३७.०
१० फेब्रुवारी लोणावळा ३७.६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.