Agriculture Machine Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Implements : पेरणी यंत्रासोबत टोकन यंत्रालाही शेतकऱ्यांची मागणी

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) सर्वदूर पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू केली असून, बैल बारदाना दुर्मीळ झाल्यामुळे शेतकरी यंदा टोकन पद्धतीने किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करण्यावर भर देणार असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.

यातूनच ट्रॅक्टर असलेल्या शेतकऱ्यांकडून पेरणी यंत्रांच्या खरेदीसाठी तर स्वतः पेरणी करण्यासाठी उत्साही असलेल्या शेतकऱ्यांनी टोकन यंत्रांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. पेरणी यंत्रासोबत यंदा टोकन यंत्रालाही शेतकऱ्यांची मोठी मागणी दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात यंदा साडेसहा हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याची आशा कृषी विभागाला आहे.

उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या कडील ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. यातून मोठ्या संख्येने शेतकरी पेरणीयंत्राच्या खरेदीसाठी बाजारात येत आहेत. सध्या तरी पेरणी यंत्राला मोठी मागणी असून, कुळव कमी संख्येने विक्री होत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे यापूर्वीच शेती अवजारे असले तरी उसाचे क्षेत्र घटल्याने पेरणी यंत्राला मागणी वाढल्याचे शेती अवजारे विक्रेते दीपक गोरे यांनी सांगितले.

बैलाच्या साह्याने होणारी पेरणी कमी होऊन ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीची परंपरा वाढली. मात्र त्यापुढे जाऊन अनेक शेतकरी आता टोकन यंत्राच्या साह्याने पेरणी करण्यासाठी पुढे येत आहेत. टोकन यंत्रामुळे एकरी १२ ते १४ किलो बियाणे लागते. पेरणी यंत्राच्या साह्याने एकरी २५ ते तीस किलो बियाणे लागते. टोकन यंत्रामुळे रान तुडवले जात नाही. सर्वच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसल्यामुळे ऐनवेळी सर्वांना ते उपलब्ध होत नाही. यामुळे टोकन यंत्रांचा पर्याय शेतकऱ्यांनी अवलंबिला आहे. एक शेतकरी दिवसाकाठी तीन एकर क्षेत्रात या यंत्राच्या साह्याने पेरणी करू शकतो.

बियाण्यांत अंतर राहिल्याने सोयाबीनची चांगली वाढ होऊन मोठ्या प्रमाणात शेंगा लागतात. काही शेतकरी कमीअधिक पावसाचा परिणाम उत्पादनावर होऊ नये, यासाठी सरी करून बोधावर टोकन यंत्राने सोयाबीनची पेरणी करतात. यामुळे एकरी १८ ते २२ क्विंटल उत्पादन मिळू शकते. काही शेतकरी यंत्रांच्या माध्यमातून पेरणीचे काम करत रोजगारही मिळवत आहे. यातूनच यंदा शेतकरी टोकन यंत्रांच्या मागणी जास्त दिसून येत असल्याचे विक्रेते परमेश्‍वर कोरे यांनी सांगितले.

खरिपाचे गेल्या वर्षी व यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र

पिकाचे नाव गेल्या वर्षीची प्रत्यक्ष पेरणी यंदाचे प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

सोयाबीन ५,०४,८१७ ४,९०,०००

खरीप ज्वारी ५,०१२ १००००

तूर ६४,३९६ ७५,०००

मूग ४,४४९ ६५,०००

उडीद २,९७० ४,५००

कापूस ७,५३६ ८,०००

ऊस ३५,६९० ५,००००

एकूण ५,९३,६४८ ६,४८,०००

गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले उसाचे क्षेत्र कमी झाले. त्याची जागा यंदा खरीप हंगामातील पिकांनी घेतली. यामुळे यंदा खरिपाचे क्षेत्रात ५० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. या स्थितीत सोयाबीनचे क्षेत्र कमी होऊन तुरीचे क्षेत्र वाढणार आहे. तुरीला यंदा चांगला भाव मिळाल्याने व कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे सरकारचे धोरण आहे. चांगला पाऊस पडल्यास यंदा उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या स्थितीत शेतकऱ्यांनी ७५ ते शंभर मिलिमीटर पाऊस किंवा जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करून नये.
- महेश क्षीरसागर, कृषी उपसंचालक, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT