Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : "शेतकरी अडचणीत आला तरी मोदी त्यावर एक शब्द बोलत नाही" - नाना पटोले

Team Agrowon

Agriculture Issue : गेल्या १० वर्षांपासून केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले होते की, पंतप्रधान झाल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, त्याच बरोबर डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. मात्र आज १० वर्षानंतरही हा सर्व चुनावी जुमला असल्याचे दिसते. भाजपचे धोरण हे शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करण्याचे आहे, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपने शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला.

दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ साली केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आले होते. पंतप्रधान मोदींनी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात शेतीमालाला १० वर्षात एकदाही दुप्पट भाव मिळाला नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. यावर ना पंतप्रधान बोलतात ना उपमुख्यमंत्री फडणवीस.

राज्यातील शेतकरी आज अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, माल निर्यात करता येत नाही. मात्र सरकार काहीही पावले उचलताना दिसत नाही. या वर्षी राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. अशा वेळी शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज असताना भाजपने तेलंगणाला ४ हजार कोटींची पॅकेज जाहीर केले. मात्र महाराष्ट्राला फुटकी कवडी दिली गेली नाही. भाजप शेतकरी विरोधी असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे नाना यांनी सांगितले.

विधाससभा निवडणुका जवळ येताच पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. या दौऱ्यात ते अन्य सर्व विषयांवर बोलतात मात्र शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नावर ते एक शब्दही बोलत नाहीत. राज्यातील सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना भाजपवाले हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यात व्यस्त असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी कांदा निर्यातबंदीचा सरकारचा निर्णय चुकीचा होता, याची कबुली अजित पवारांनी दिल्याची आठवण नाना पटोले यांनी करून दिली. वर्ध्यात झालेल्या एका सभेत मोदींनी सोयाबीनला १० हजार भाव देऊ असे जाहीरपणे सांगितले होते. भाजपाचे जे लोक विरोधात असताना सोयाबीनला ६ हजार भाव मिळावा म्हणून आंदोलन करत होते ते आज सत्तेत आल्यानंतर मात्र फक्त ४ हजार भाव देत आहेत. जास्त उत्पादन खर्च आणि कमी दर यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना २० हजार कोटींचा फटका बसला आहे. राज्यातील महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येणारे असल्याचा हा आणखी एक पुरावा असल्याचे नाना पटोले यांनी दाखवून दिले.

शेतकरीच जगाचा पोशिंदा असून त्याला न्याय मिळाला पाहिजे, असे सांगणाऱ्या भाजपनेच शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन कायदे आणले आणि त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षलवादी, अतिरेकी ठरवण्यात आले. गेल्या १० वर्षात खतांचे भाव वाढले, डिझेलचे दर वाढले, बी-बियाणांचा भाव वाढला मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव काही वाढला नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT