Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Leader of Farmers : सत्ता असताना ती धुडकावून लावून स्वतःचं नवीन साम्राज्य उभं करण्यासाठी हिंमत आणि विद्रोही बाणा लागतो. तो नाना पटोले यांच्यात ठासून भरलेला आहे.
Nana Patole
Nana PatoleAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : सत्ता मिळवण्यासाठी लोक हपापलेले असतात. सत्तेपुढे मोठमोठे लोक झुकतात. सत्ताधाऱ्यांच्या हो मध्ये हो मिळवतात. परंतु एखादीच व्यक्ती असते जी या सत्ताधीशांविरोधात जाऊन त्यांना खडबडून जागं करते. सत्ता असताना ती धुडकावून लावून स्वतःचं नवीन साम्राज्य उभं करण्यासाठी हिंमत आणि विद्रोही बाणा लागतो. तो नाना पटोले यांच्यात ठासून भरलेला आहे. नानाभाऊ शेतकरी कुटुंबात वाढले, त्यांचे वडील कृषी अधिकारी तर आई गृहिणी होती. लहानपणापासूनच शेतात राबत असल्याने शेतकऱ्याला होणारा त्रास, त्यांचं दु:ख नाना पटोले सुरूवातीपासूनच जाणून आहेत.

त्यामुळेच कुठलाच राजकीय वारसा लाभलेला नसतानाही स्वतःच्या हिमतीवर आणि लोकांच्या पाठिंब्याने ते राजकारणात आले. राजकारणात येताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरूवात केली. पक्ष कोणताही असो सत्ता असेल तर आपण आपल्या लोकांच्या समस्या सोडवू शकू अशा विचाराने ते काम करत राहिले. परंतु ते भाजपाकडून सत्तेत आले तेव्हा पक्षातील काही धोरणं त्यांना पटेनाशी झाली होती.

सामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये जीएसटी हे एक महत्वाचं धोरण होतं. सर्वच वस्तूंवर सरकार जनतेकडून विविध माध्यमांतून कर लागू करून अतिरिक्त करवसुली करत होतं. शेतीच्या कच्च्या मालावरदेखील जीएसटी लागू झाला होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या शेतकऱ्याला कच्चा माल विकत घेणंही अवघड झालं होतं. परिणामी, शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढू लागली. नाना पटोले यांनी याच प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण सत्ताधारी पक्षाने त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं नाही.

Nana Patole
Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

तसंच इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांवरही सरकार काहीच हालचाल करत नव्हतं. नाना पटोले यांना हे सहन होण्यासारखं नव्हतं. त्यामुळे त्यांनी लोकसभेत शेतकरी व इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांवरून मोदी सरकारवर हल्ला चढवला. “चुकीच्या निर्णयांचं समर्थन करणार नाही. मी जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालो.

मी इथे खुर्च्या उबवायला आलो नाही, जनतेची कामं होणार नसतील तर काय फायदा या सत्तेचा?” असं म्हणत नाना पटोले यांनी ८ डिसेंबर २०१७ रोजी शेतकरी व इतर मागासवर्गाच्या प्रश्नांवरून झालेल्या या वादामुळे लोकसभा सदस्यत्वाचा व भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे त्यांनी आपली शेतकऱ्यांसाठीची चळवळ सुरूच ठेवली. नाना पटोले हे हाडाचे शेतकरी असल्याने ते शेतकऱ्यांच्या गरजा जाणून आहेत. २०१८ साली नाना पटोले यांची किसान काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

शेतीसाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. त्यामुळे नाना पटोले यांनी सर्वप्रथम पाण्याची व्यवस्था करून दिली. त्यांच्या गावातील चुलबंद नदीवरील दुर्गाबाई डोह येथील बांधाच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पाचे काम १९९५-१९९६ मध्ये सुरू करून २०१५ साली पूर्ण झाले. या प्रकल्पामुळे ९६३४ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ झाला. तसेच भंडारा जिल्ह्यातदेखील पाणी मुबलक प्रमाणात आहे.

Nana Patole
Indian Agriculture : ... ती शेती उद्धारी

मात्र, या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी चुलबंद नदीवर जलसंधारण विभागाच्या माध्यमातून बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होतो आहे. तसेच नाना पटोले यांनी शेतकारी मेळाव्याचे वेळोवेळी आयोजन करून, शेतकऱ्यांसोबत प्रबोधनात्मक भाष्य केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जागं करण्यासाठी नाना पटोले यांनी वेळोवेळी बैलबंडी मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा, पायदळ मोर्चा काढला.

भंडारा जिल्हा धानउत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. येथील शेतकऱ्यांना धानउत्पादनानंतर त्याची साठवणूक करणं हे मोठं काम असतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी १२ धान गोदाम नाना पटोले यांनी बांधून दिले. या धान गोदामात साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी प्रत्येक क्विंटलच्या दरावर ७०० रूपयांचा बोनस मिळवून दिला. त्यांनी परसटोला या गावात सर्व शेतकऱ्यांसाठी पट्टा पद्धतीने रोवणी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. तसेच परतीच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते.

राज्यातील बहुतांश खरिपाची पिके अक्षरशः पाण्यात वाहून गेली. सरकारने पुरेशा प्रमाणात कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरू केली नाही. त्यामुळे शेतक्ऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना त्यांचा शेतमाल विकावा लागत होता. अगोदरच आस्मानी संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची आता खासगी व्यापाऱ्यांकडून लूट सुरू होती. धान खरेदीसाठी घातलेल्या ऑनलाइन नोंदणीच्या अटीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मालाची अद्याप खरेदी झाली नाही.

यामुळे सरकारने ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून शेतकऱ्यांसाठी पुरेशी खरेदी केंद्र सुरू करावीत. तसेच त्यांच्या मालाची खरेदी सुरू करून अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना केली. ते भंडाऱ्यात कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत, आपल्या गावातील तरूण पिढीला शेतीत प्रगत करण्यासाठी त्यांनी या महाविद्यालायची आखणी केली आहे. अशा अनेक बाबतीत नाना पटोले कायम शेतकाऱ्यांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ते कायमच बळीराजाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देणारे नेते आहेत. सत्ता असो वा नसो, नाना पटोलेंनी आपण बळीराजाचे खरे साथीदार आहोत हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com