Orange Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Farming : आंबिया बहरामध्ये सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Manure Management :

शेतकरी नियोजन

पीक : संत्रा

शेतकरी : अभिषेक सुनीलपंत खेरडे

गाव : धोतरखेडा, ता. अचलपूर, जि. अमरावती

संत्रा लागवड : ८ एकर

एकूण झाडे : ९५०

अमरावती जिल्ह्यातील धोतरखेडा (ता. अचलपूर) हे सुमारे साडेचार हजार लोकसंख्येचं छोटसं गाव. येथील अभिषेक खेरडे यांची ८ एकर शेती आहे. त्यांनी अभियांत्रिकी शाखेत इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे.

अभिषेक यांचे वडील सुनीलपंत हे शेतकरी तसेच संत्रा व्यापारी असल्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच संत्रा शेतीची आवड होती. सुनीलपंत यांनी २४ वर्षांपूर्वी संत्र्याच्या सुमारे ५०० झाडांची १८ बाय १८ फूट अंतरावर लागवड केली होती. त्यानंतर अभिषेक यांनी ८ वर्षांपूर्वी ४५० झाडांची १७ बाय १७ फूट अंतरावर नवीन लागवड करत संत्रा क्षेत्रामध्ये भर घातली. अशारीतीने संपूर्ण ८ एकरांत संत्रा लागवड केलेली आहे. सध्या संपूर्ण संत्रा लागवडीमध्ये आंबिया बहर धरला आहे.

आंबिया बहर नियोजन

बहर धरण्यासाठी साधारण ऑक्टोबर महिन्यात बाग ताणावर सोडली होती. हा ताण दरवर्षी साधारणपणे ५ डिसेंबरच्या दरम्यान मोकळे पाणी देत तोडला जातो. मात्र यावर्षी २९ नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे आपोआपच तुटला. सलग ३ दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे बागेचा ताण तुटण्यास मदत झाली.

हवामान अंदाजानुसार अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन अभिषेक यांनी साधारण २५ नोव्हेंबरच्या दरम्यान झाडांना शेणखत आणि रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या होत्या. त्यात १०ः२६ः२६, झिंक सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर केला होता. रासायनिक खतांच्या मात्रा चर काढून देण्यात आल्या. त्यामळे नवीन पालवी लवकर फुटण्यास मदत होते. यासह सूक्ष्म अन्नद्रव्ये २०० ते २५० ग्रॅम, ह्युमिक ॲसिड १०० ते १५० ग्रॅम दिले जाते.

रासायनिक खतांच्या मात्रा दिल्यानंतर ८ दिवसांनी पहिले पाणी बागेस दिले.

कीड-रोग नियंत्रण

बागेत बदलत्या हवामानानुसार बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी झाडांचे सातत्याने निरिक्षण करून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.

बहर फुटण्यासाठी झाडांना पोषक घटकांचा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांची फवारणी घेतली जाते.

मोकळे पाणी देण्यावर भर

बागेमध्ये मोकळे पाणी देण्यावर भर दिला जातो. त्यासाठी ट्रॅक्टरच्या मदतीने प्रथम झाडांना माती लावून नंतर सिंचनासाठी मोठे दांड काढले जातात. त्यानंतर सिंचन केले जाते. बागेतील झाडांचे वय अधिक असल्याने त्यांची पाण्याची गरजही अधिक असते. त्यामुळे दांड पद्धतीने पाणी दिले जाते. या पद्धतीने सिंचन केल्यामुळे झाडांच्या खोडापासून पाण्याचे अंतर लांब राहते. त्यामुळे डिक्यांचा प्रादुर्भाव कमी होतो, असा त्यांचा अनुभव आहे.

आंतरपीक लागवड

संत्रा बागेत हिरवळीचे खतासाठी धैंचा किंवा बोरू लागवड केली जाते. पीक फुलोऱ्यात आल्यावर जागेवरच गाडले जाते. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. त्याचा संत्रा झाडांना फायदा होतो.

तणनियंत्रण

तणनियंत्रणासाठी वर्षातून दोन वेळा तणनाशकांचा वापर केला जातो. दिवसेंदिवस मजुरी दरांत वाढ होत आहे. त्यामुळे मजूर लावून मोठ्या क्षेत्रातील बागेत तणनियंत्रण करणे शक्य होत नाही. त्यासाठी तणनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यानुसार जानेवारीच्या शेवटी आणि मार्च महिन्यात तणनाशकांची फवारणी घेतली जाते.

फवारणीचे नियोजन

नवती एकसारखी फुटण्यासाठी साधारण २५ डिसेंबरच्या दरम्यान झिंक सल्फेट, १२ः६१ः० यांचा फवारणीद्वारे वापर केला. तसेच सिट्रस सायला किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घेतली.

फुलकळी चांगली येण्याकरिता जानेवारीच्या १० तारखेच्या दरम्यान बोरॉन, सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली. तसेच मावा, सिट्रस सायला किडीसाठी रासायनिक कीटकनाशकांची दुसरी फवारणी घेतली.

फळे मुगाच्या दाण्याएवढ्या आकाराची झाल्यावर १ फेब्रुवारीला पुन्हा सूक्ष्म अन्नद्रव्ये, ०ः५२ः३४ यांची फवारणी घेतली.

फळे वाटाणा आकाराची झाल्यावर माईट्सचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची एक फवारणी घेतली.

मागील आठवड्यातील कामकाज

आंबिया बहराची फळे वाटाणा आकाराएवढी आहेत. फळांवर तसेच पानांवर मावा तसेच थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसून येत होता. त्यासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक कीडनाशकांची फवारणी घेतली आहे.

पानांवर काळपट डाग दिसून येत होते. त्यासाठी रासायनिक बुरशीनाशकांची एक फवारणी घेतली. तसेच झिंक, बोरॉन यांची देखील फवारणी केली आहे.

नियमितपणे दर ८ ते १० दिवसांनी सिंचन करण्यात सातत्य राखले आहे.

आगामी नियोजन

सध्या झाडांवरील फळे बोराच्या आकाराएवढी झाली आहेत. या काळात अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी युरिया सोबत पोटॅश आणि मॅग्नेशिअमच्या मात्रा जमिनीतून दिल्या जातील. प्रति झाड ४०० ग्रॅम युरिया, २०० ग्रॅम पोटॅश आणि १०० ग्रॅम मॅग्नेशिअम याप्रमाणे मात्रा दिली जाईल.

कोळी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी घेतली जाईल.

झाडावरील वाळलेल्या, कीड-रोगग्रस्त फांद्या काढल्या जातील. त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल. फांद्या कापणीसाठी कैचीचा वापर केला जाईल. प्रत्येकवेळी कैची निर्जंतुकीकरण करून फांद्या कापल्या जातात. त्यामुळे रोगग्रस्त फांद्यावरील रोगाचा प्रसार निरोगी फांद्यावर होत नाही. त्यानंतर कापलेल्या जागी कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर केला जाईल. ही सर्व कार्यवाही मजूर लावून केली जाते.

जमीन हलक्या प्रकारची असल्याने सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाईल. झाडांना ४ दिवसाआड पाणी देण्यात येईल. तापमानातील वाढ आणि जमिनीतील ओलावा यांचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जाईल.

येत्या काळात फळांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी आणि झाडांचे पोषण व्यवस्थित होण्यासाठी मुख्य अन्नद्रव्यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचा प्रमाणशीर वापर करण्यावर भर दिला जाईल.

अभिषेक खेरडे ९९६०७८०८१४ (शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT