Beed News : ‘‘वाढत्या ताणतणावाचे रूपांतर पुढे चालून मनोरोगात होऊ न देण्यासाठी माणसाने एकाकी न राहता सतत चांगल्या कार्यात गुंतून रहायला हवे. एकाकी राहिल्याने अनावश्यक अतिविचार मनात येतात आणि त्यामुळे मानसिक आरोग्य प्रभावित होते. त्यासाठी आपण भावनिक गुंतवणूक करायला हवी.
त्यामुळे आपण ज्यावेळेस अडचणीत असू त्यावेळी आपल्याला आपल्या नात्यातून भावनिक आधार मिळून त्यातून सही सलामत आपण बाहेर येऊ शकतो,’’ असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त कान्नापूर (ता. धारूर) येथे २१ गावातील शेतकऱ्यांनी मिळून आयोजिलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवात वैचारिक जागरणासह सर्व आजारांवर निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. त्याअंतर्गत शुक्रवारी (ता. २२) डॉ. दाभोलकर यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘अजय बुरांडे यांच्या संकल्पनेतून व श्यामसुंदर महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या या महोत्सवातून आरोग्य संवर्धनाचा मौलिक कृतीयुक्त संदेश वैचारिक परिवर्तनाच्या चळवळीला उभारी देणारा ठरेल. माणसाच्या शरीराला जसे आजार होतात, अगदी त्याप्रमाणे मनावर होणाऱ्या सततच्या आघाताने मन दुःखी होते.
यातून सावरण्यासाठी त्याला उपचाराची गरज असते. मात्र आपण आजारी आहोत हे स्वतः स्वीकारायला लोक तयार होत नाहीत. देशात दरवर्षी दोन लाख लोक आत्महत्या करतात. हे केवळ परिस्थिती वाईट झाली म्हणून नव्हे तर ती वाईट परिस्थिती आपल्या मनाला नीट हाताळता आली नाही म्हणून. मानसिक ताणतणावांचे योग्य समायोजन करण्यासाठी मानसिक आरोग्याची गरज आहे.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.