
शेतीच्या मागे लागलेले अनिश्चिततेचे सावट ही शेतकरी (Indian Farmer) बांधवांना नवीन गोष्ट नाही. गेल्या काही वर्षांमध्ये तर शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) हा एक खूप मोठा प्रश्न म्हणून आपल्या समोर आलेला आहे. अनेक पातळ्यांच्या वर प्रयत्न, कर्जमाफी (Farmer Loan Waive) अशा अनेकविध गोष्टींच्या नंतर देखील शेती मागचे दुष्टचक्र थांबताना दिसत नाही.
या सगळ्यांमधून बाहेर पडण्यामध्ये जसे शेतीचे अर्थकारण, प्रचलित राजकारण, शेतीच्या आधुनिक पद्धतींचा वापर अशा अनेक गोष्टींचा संदर्भ आहे, त्याचप्रमाणे शेतकरी बंधू-भगिनींची मानसिकता उत्तम राहणे यासाठी करायचे प्रयत्नदेखील अत्यंत महत्त्वाचे आहेत.
जेव्हा आजूबाजूची परिस्थिती आपल्या हातात राहत नाही, त्या वेळी आपले मन आपल्या ताब्यात ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाचे असते. म्हणून या सदरातून दर आठवड्याला आपण आपल्या मनाच्या विषयी समजून घेणार आहोत.
परिस्थिती कितीही अवघड असली, तरी आपल्या मनाच्या शेतीत तणकट वाढू नये आणि तिथे योग्य विचारांचे पीक जोमाने यावे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आज पहिल्यांदा समजून घेवूया, आहे त्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्याचे महत्त्व!
एका पाठोपाठ येणारे ताण हे मानवी मनाला एक प्रकारचे बधिरत्व देतात. त्याचे खूप खोल आणि दूरगामी परिणाम त्या व्यक्तीच्या आणि एकुणातच समाजाच्या मनावर होऊ शकतात. मार्टिन सेलिग्मन नावाच्या शास्त्रज्ञाचा एक खूप प्रसिद्ध प्रयोग आहे.
या प्रयोगामध्ये, एका बंद पिंजऱ्यात ठेवलेल्या उंदराला विजेचे सौम्य झटके दिले जातात. सुरुवातीला तो उंदीर खूप सैरावैरा पळतो आणि पिंजऱ्यातून निसटायचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने आपली यामधून सुटका नाही,
असा विचार करून एका जागी थिजल्यासारखा बसून राहतो. मग थोड्या वेळाने आपण पिंजरा काढून घेतला आणि उंदराला पळून जायची संधी निर्माण झाली तरी तो तसाच थिजून राहतो पळून जात नाही.
आयुष्यातील सततच्या ताणांमधून लढण्याची प्रेरणा गमावून बसलेली माणसांच्या बाबतीत देखील असेच काहीसे होत असते. आपल्याला स्वतःला देखील जेव्हा ताण जास्त होतो, तेव्हा अशी हताशा अनुभवायला येऊ शकते. शेती व्यवसायातील अनिश्चितता ही देखील आपल्या मनाची अशीच परिस्थिती करू शकतात.
पण चांगली गोष्ट अशी, की उत्क्रांतीच्या प्रवासात आपला मानवी मेंदू हे उंदराच्या मेंदूच्या बराच पुढे गेला आहे. त्यामुळे जरी शेतीतील अपयशाच्या पाठोपाठ येणाऱ्या मानसिक अस्वस्थतेच्या लाटेने काही काळ आपल्याला हतबुद्ध वाटले तरी त्यामधून बाहेर पडण्याची क्षमतादेखील आपल्या मनात असते.
गमतीचा भाग म्हणजे जशी कोरोना होऊ नये म्हणून आपण सर्व जण लस घेतो, तसेच आपले मन जास्त तणाव आला तरी हताश-निराश होऊ नये म्हणून आपण आशादायक विचार कसे करावे, याच्या कौशल्यांची लस घेऊ शकतो.
सकारात्मक विचार करण्याचे मानसशास्त्र (पॉझिटिव्ह सायकोलॉजी) ही खूप झपाट्याने विकसित होणारी ज्ञान शाखा आहे. जसे आपण शाळेमध्ये इतिहास, भूगोल, गणित शिकतो तसे आता परदेशातील काही शाळांमध्ये आशादायक विचार कसे करावे, निराशेचे विचार कसे टाळावे, असा विषय अभ्यासाला असतो.
आणि त्या लस मात्रेमधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा डोस आहे, ‘छोडना नही पकडे रहना’! पूर्वी टीव्हीवर येणाऱ्या या फेव्हिकॉलच्या जाहिरातीतील आशयाप्रमाणे टिकून राहिले तर सगळे शक्य आहे, या दृष्टिकोनातून होते. सध्याच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची गुरुकिल्ली या दृष्टिकोनात दडलेली आहे.
समुद्रात जशी आलेली लाट ही हळूहळू मोठी होते आणि टप्प्याटप्प्याने परत खाली येते, तसेच अवघड परिस्थितीचे असते. कोणतीही अवघड परिस्थिती ही कधीच कायम राहत नाही ती आज ना उद्या चांगल्या अर्थाने बदलणार असते. तोपर्यंत मात्र आपल्याला टिकून राहावे लागते म्हणून छोडना नही पकडे रहना, हा आपला पहिला मंत्र आहे
(लेखक परिवर्तन संस्थेत मनोविकार तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.