Cashew Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming : पालवी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न

Team Agrowon

Cashew Farming Management :

शेतकरी नियोजन : पीक : काजू

शेतकरी : गुलाबराव शांताराम चव्हाण

गाव : वैभववाडी, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण क्षेत्र : १० एकर

काजू लागवड : चार एकर

कोकिसरे बांधवाडी (ता. वैभववाडी) येथे गुलाबराव चव्हाण यांची १० एकर जमीन आहे. यातील चार एकरमध्ये वेंगुर्ला सात या जातीची ३७५ काजू कलमे आहेत. सध्या बागेतील मशागतीची कामे नुकतीच पूर्ण झाली आहेत. आगामी काळात तणनियंत्रण केले जाईल. कलमांना येणारी पालवी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

मागील कामकाज

गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबला होता. त्यानंतर अपेक्षित थंडी पडली नाही. त्यामुळे पालवी थोड्या प्रमाणात आली. थंडीमध्ये सातत्य नसल्यामुळे मोहरदेखील दोन, तीन टप्प्यांत आला. जानेवारीमध्ये मोहर आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांची एक फवारणी घेतली. फेब्रुवारीपासून काजू हंगामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर साधारण मार्चपासून काजू बी जमिनीवर पडण्यास सुरुवात झाली. जमिनीवर पडलेले काजू बी गोळा करून घरी आणले. काजू बी स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर हलके ऊन देऊन घेतले.

एप्रिल अखेरपर्यंत चांगला बहर होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहराचे उत्पादन सुरू झाले. मे दुसऱ्या आठवड्यात काजू हंगाम आटोपला. त्यानंतर कलमांच्या मुळांजवळील सर्व पालापाचोळा गोळा करून बुंध्यात घालण्यात आला. मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे पालापाचोळा चांगला पद्धतीने कुजण्यास मदत झाली. त्याचा नक्कीच कलमांना फायदा झाला. या वर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडे कमी होते. या कालावधीत खतमात्रा देण्याचे नियोजित होते. त्यानुसार मे अखेरीस लेंडीखताची उपलब्धता करून ठेवली होती. प्रति झाड सहा ते सात किलो प्रमाणे लेंडीखत दिले.

याशिवाय रासायनिक खतांच्या मात्रा कलमांच्या भोवती चर खोदून त्यात दिल्या. जुलै महिन्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाली. या कालावधीत बागेमध्ये कोणतीच कामे करता आली नाहीत. त्यामुळे सध्या बागेत छोटी झुडपे आणि तणे देखील वाढली आहेत. तण नियंत्रणासाठी तणनाशक फवारणी करण्याचे नियोजित आहे. त्यानंतर लहान झुडपे मजुरांच्या मदतीने काढले जातील.

आगामी नियोजन

सप्टेंबर अखेरीपर्यंत कलमांना पालवी येण्यास सुरुवात होईल. या कालावधीत पालवी टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरवर्षीप्रमाणे फवारणीचे नियोजन राहील. त्याचे कलमांवर चांगले परिणाम दिसून येत आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कलमांना मोहर येण्यास सुरुवात होईल. या काळात मोहरावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेची वेळोवेळी पाहणी केली जाईल. मोहर पूर्ण आल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत रासायनिक कीडनाशकांची फवारणी घेतली जाईल. गरज भासल्यास दुसऱ्या फवारणीचे नियोजन केले जाईल. विनाकारण कलमांवर रासायनिक फवारणी घेण्याचे टाळले जाते.

साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये बागेभोवतीचे गवत सुकण्यास सुरुवात होते. या भागात वणवे लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गवत सुकताच संपूर्ण बागेभोवती आगरेषा काढली जाईल. याशिवाय कुंपणालगतची संपूर्ण जागेतील पालापाचोळा गोळा करून ती जागा स्वच्छ केली जाईल.

गुलाबराव चव्हाण, ९४०३५७५७५७

(शब्दांकन : एकनाथ पवार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT