Nagpur Ratnagiri Highway : रत्नागिरी- नागपूर महामार्गात जमीन हस्तांतर झालेल्या शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळाली असताना याच मार्गातील उदगांव ते चोकाक दरम्यानच्या मार्गावरील जमीन हस्तांतर होणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना मात्र दुप्पट भरपाई मिळणार आहे. सरकारने मागच्या काही दिवसांपूर्वी जमिनीचे निकष बदलल्याचा अनेक गावातील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांच्या तोट्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
काही शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाला तर काही दुप्पट भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाच्या कळीचा मुद्दा बनला आहे. या भागातीलच शेतकऱ्यावर अन्याय का? असा सवाल करण्यात येत आहे. केवळ शासनाच्या बदललेल्या निकषाचा दहा गावांतील शेतकऱ्यांना सुमारे साडेसातशे कोटींचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळेच शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
नागपूर रत्नागिरी महामार्ग क्रमांक १६६ मधील शेवटचा टप्पा असलेल्या चोकाक ते उदगावदरम्यान आठशेहून अधिक शेतकऱ्यांची जमीन हस्तांतर केली जाणार आहे. यापूर्वी रत्नागिरी नागपूर महामार्गातील ९०७ किलोमीटरचा झालेल्या किंवा होत असलेल्या मार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळाली आहे. दुसरीकडे मात्र राज्य शासनाने २०२१ मध्ये काढलेल्या अधिसूचनेचा फटका उदगाव ते चोकाक मार्गावर ३७ किमी अंतरात येणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे.
नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग
९४५ किलोमीटरचा आहे. सध्या शेवटच्या टप्प्यातील काम सुरू आहे. आतापर्यंत राहिलेल्या कामात आंबा घाट, पैजारवाडी, केलीं, चोकाक येथील मिळकतींचे संपादन केले आहे. या शेतकऱ्यांना चारपट रक्कम मिळाली आहे. शिवाय प्रत्याक्षात कामालाही सुरुवात झाली आहे. सध्या चोकाक ते उदगांव कृष्णा नदीपर्यंतच्या पुलापर्यंतचे काम होणार आहे. आता शेवटच्या टप्प्यातील भूसंपादनासाठी निकष बदलल्याने ज्यांना कोटीत रुपये
मिळणे अपेक्षित होते, त्यांना आता लाखात मिळणार आहेत. २०२१ मधील बदलेल्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
शासनाने ६ ऑक्टोबर २०२१ रोजी नवा अध्यादेश काढला आहे. त्यात मोबदल्याच्या रकमेचा गुणांक एक दिला आहे. जमिनीचे मूल्यांकन करताना नोंदणी महानिरीक्षकांकडून जाहीर होणाऱ्या टप्पा पद्धतीच्या धर्तीवर जमिनींच्या निर्धारित बाजार दर मूल्यांकनात वीस टक्के कपात करण्यात येईल. असा आदेश असल्याने चोकाक ते उदगावपर्यंतच्या शेतकऱ्यांना दुप्पटच भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी व प्राधिकरण विभाग यांच्यात संघर्षाची चिन्हे निर्माण होत आहेत.
आमचा महामार्गाला विरोध नाही. मात्र जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडवणे अपेक्षित आहे. महापुराचा विचार करून महामार्ग उभा करावा. शिवाय दहा गावांतील शेतकऱ्यांनाही चौपट भरपाई मिळाली पाहिजे; अन्यथा काम होऊ देणार नाही. - विक्रम पाटील, अध्यक्ष, महामार्ग शेतकरी बचाव कृती समिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.