Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Digital Agriculture Technology : डिजिटल कृषी क्रांती शेतकऱ्यांपर्यंत न्यावी

Climate Change : हवामान बदलामुळे कृषी व्यवस्थेवर आलेल्या संकटाला तोंड देण्यात या क्रांतीचा वाटा बहुमोल राहील.

मनोज कापडे

Pune News : ‘‘जग आता वेगाने ‘डिजिटल कृषी क्रांती’कडे वाटचाल करीत आहे. हवामान बदलामुळे कृषी व्यवस्थेवर आलेल्या संकटाला तोंड देण्यात या क्रांतीचा वाटा बहुमोल राहील. त्यामुळे भारतालाही या क्रांतीचा वेगाने अवलंब करीत तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ई-शेती पोहोचवावी लागेल,’’ अशी भूमिका राष्ट्रीय पातळीवरील कृषिशास्त्रज्ञांनी मांडली.

पुण्यात शुक्रवारी (ता. ८) एका खासगी हॉटेलमध्ये ‘हवामान अनुकूल कृषी व्यवस्था व डिजिटल शेतीच्या वाटचालीत पत्रकार व माध्यमांची भूमिका’ या विषयावरील एकदिवसीय परिषदेत कृषिशास्त्रज्ञांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. उद्‍घाटन महात्मा फुले (राहुरी) कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

या वेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रकल्प समन्वयक डॉ. व्ही. यू. एम. राव, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी, गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय, डॉ. सुनील गोरंटीवार, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, दूरदृश्‍यप्रणालीद्वारे ‘आयसीएआर’चे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण विभागाच्या समन्वयिका अनुराधा अग्रवाल, माजी कुलगुरू बी. व्यंकटेश्‍वरलू उपस्थित होते.

उपमहासंचालक डॉ. अग्रवाल म्हणाले, “हवामान बदलाच्या विरोधासाठी नेमके कसे लढायचे हे शेतकऱ्यांना समजावून सांगितल्याशिवाय आपण कितीही संशोधन केले तरी उपयोगाचे ठरणार नाही. हवामान बदलास तोंड देणारी सहज व सोपी तंत्रे शोधावी लागतील. ती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत न्यावी लागतील. त्यात माध्यमांची भूमिका खूप मोलाची राहील.”

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘जागतिक हवामान बदलाचे देशाच्या शेती व्यवस्थेवर चिंताजनक पडसाद उमटत आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ अनेक प्रकल्पांवर यशस्वीपणे काम करीत आहेत. ही समस्या हाताळण्यासाठी डिजिटल अॅग्रिकल्चर उपयुक्त ठरेल.

त्याआधारे अतिप्रगत कृषी तंत्रांचा शोध व त्याचा अधिकाधिक वापर वाढवावा लागेल. कृषी संशोधनातील विविध अंगांना एकत्रितपणे काम करावे लागेल. त्यामुळे उपयुक्त कृषी तंत्र व पद्धती कळतील. त्यांना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जावे लागेल. त्यात माध्यमांचा सहभाग उपयुक्त ठरेल.’’

‘हवामान बदलाचा सामना करा’

“जागतिक हवामान बदलाच्या परिणामांना घाबरू नका; त्याचा शास्त्रोक्त सामना करा. आपण पर्यावरणाचा ऱ्हास केला. त्यामुळे हे संकट येणार होतेच. या संकटाने आजची शेती बेभरवाशाची केली.

हवामान बदलामुळेच अवेळी पाऊस, गारपीट, वादळे होत आहेत. मात्र आता चिंता करून किंवा भीती बाळगून काहीही उपयोग होणार नाही. याबाबत कृषी विद्यापीठांनी विकसित केलेली तंत्रे सामान्य शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे हाच पर्याय आपल्यासमोर आहे,’’ असे कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले.

‘ई-शेतीसाठी तयार राहा’

‘डिजिटल अॅग्रिकल्चर’ म्हणजेच ई-शेती होय. यात डिजिटल माहिती व उपकरणांचा अधिकाधिक उपयोग करणे हे ध्येय यात अपेक्षित आहे. डिजिटल तंत्रांचा वापर असलेले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, ब्लॉकचेन, मोबाइल अॅप्लिकेशन, ई-वखार पावती, ई-लिलाव, ट्रेसेबिलिटी तंत्र ही सारी ई-शेतीची विस्तारत जाणारी साधने आहेत. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी ही साधने गावागावांतील शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे या परिषदेत सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT