Ahilyanagar News: शेती अवजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी महाडीबीटीवर अर्ज मागवले जातात. अर्जाचा ओघ सुरूच आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून आलेल्या अर्जाची सोडतच झाली नाही. सोडत कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. राज्यातील लाखो शेतकरी सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास पावणेचार लाख अर्ज सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. निधी नसल्याने ही सोडत रखडली असे सांगितले जात आहे. लवकरच सोडत होईल एवढेच सांगितले जात आहे.
शेती अवजारांसह बियाणे, खते, ठिबक, तुषार, शेततळ्यासह फलोत्पादन, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे व अन्य सिंचन साधने आदी बाबींचा कृषी विभागाकडून लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ देण्यासाठी चार वर्षांपासून कृषी विभागाने ‘महाडीबीटी’ पोर्टल विकसित केलेले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, आदी योजनांच्या एकाच अर्जावर विविध घटकांच्या योजनांचा लाभ देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज आले तर सोडत काढतात.
जिल्हा परिषदेच्या विशेष घटक योजनेचा लाभही याच सोडतीतून दिला जातो. एकाच अर्जावर अधिक योजनेचा लाभ मिळत असल्याने किचकट प्रक्रिया सोपी झाली आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसानही चार वर्षांपासून कमी झाले आहेत. अनुसूचित जाती व जमातीमधील काही योजनांची सोडत वगळता ‘महाडीबीटी’ पोर्टलवर आलेल्या अर्जांची मात्र गेल्या एक वर्षापासून सोडतच नाहीत.
ज्याची सोडत झाली त्यातील बहुतांश लाभार्थ्यांना निधी नाही. महाडीबीटीवर आलेल्या अर्जाची मागील फेब्रुवारी २०२४ मध्ये सोडत झाली होती. खरेदीसाठी अनुदान मिळावे म्हणून ‘महाडीबीटी’वर मागवलेल्या अर्जांचा ओघ सुरू आहे. मात्र सोडत नसल्याने राज्यातील मोठ्या प्रमाणात अर्जाला सोडतीची प्रतीक्षा आहे. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे ३ लाख ७५ अर्ज प्रतीक्षेत असून, वर्षभरात केवळ १४८० शेतकरी अर्जाची लाभासाठी निवड झालेली आहे.
कृषी विभागाकडून शेती अवजारांच्या खरेदीसाठी यांत्रिकीकरणातून अनुदान दिले जाते. त्यात प्रामुख्याने ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळावे अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शेती मशागतीसाठी बैलकामाचे प्रमाण कमी झाल्याने ट्रॅक्टरला मागणी अधिक असल्याचे सांगितले जात आहे. एकट्या नगर जिल्ह्यात सध्या मागणी केलेल्या साडेतीन लाख अर्जात केवळ ट्रॅक्टरला अनुदान मिळण्यासाठी १ लाख २२ हजार ३१० अर्ज सध्या ‘महाडीबीटी’कडे आहेत. सर्वच शेतकऱ्यांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे.
चार वर्षांत अकरा लाख अर्ज
शेती अजारासह बियाणे, खते, ठिबक, तुषार, शेततळ्यासह फलोत्पादन, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे व अन्य सिंचन साधनांसाठी अनुदान मिळावे यासाठी एकट्या अहिल्यानगर पहिल्या वर्षी १ लाख १८ हजार, दुसऱ्या वर्षी २ लाख ४२ हजार, तिसऱ्या वर्षी २ लाख ६१ हजार, तर यंदा १ लाख ८० हजारांच्या जवळपास म्हणजे एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात चार वर्षांत महाडीबीटीवर अकरा लाखांच्या जवळपास अर्ज आले. नको असल्यांनी लाभ नाकारला. मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला. यंदा मात्र वर्षापासून सोडत नाही. यंदा ‘लाडकी बहीण’सह अन्य योजनांमुळे निधी मिळाला नसल्याने सोडत झाली नसल्याची चर्चा सुरू आहे. कृषी विभागाकडून मात्र त्याबाबतचे निश्चित कारण सांगितले जात नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.