Onion Production Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Production : कांदा उत्पादकांची दिवसा-ढवळ्या लूट

Team Agrowon

Onion Market Update : शेतीमालाच्या बाजारावर संपूर्ण नियंत्रण हे व्यापारी, अडते आणि उरले सुरले सरकारचे आहे. सरकार कायदे करते, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, तसेच त्यात पळवाट काढून शेतकऱ्यांना लुटले जाते आहे.

सध्या महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा काही ठरावीक बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत. पण बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी अडत्याला पदरचे पैसे देऊन येत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा काढला नाही, काहींनी जागेवर ढीगच्या ढीग सडू दिले, तर काहींनी अक्षरशः फेकून दिले.

महाराष्ट्रात मागील तीन महिन्यांत ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यामध्ये ९० टक्के या कांद्याला योग्य दर न मिळाल्याने झाल्या आहेत. अशा बातम्या सतत येत आहेत. एक-दोन अडत्यांना सरकारने दंड केला पण हा प्रकार थांबला नाही उलट वाढलेला आहे.

बाजार समिती आवारात जाऊन सत्यता कोणी पडताळून पाहण्यास तयार नाही. त्या ठिकाणी खरोखर लिलाव होतात का? यावर शेतकऱ्यांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केलेले आहे. लिलावादरम्यान बाजारात व्यापारी दिसत नाहीत.

मग लिलाव कसे होतात, कोण बोली लावते? अडते त्यांची माणसं व्यापारी म्हणून उभा करतात का? असे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. याला राज्यातील काही बाजार समिती अपवाद असू शकतात.

बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी कांदा सोलापूर बाजार समितीला घेऊन जातात. त्यातील काही शेतकऱ्यांनी अनुभव सांगितलेले आहेत. शेतकरी सांगतात, की पुकारा करताना अडते हे आजूबाजूला उभे असलेले लोक नावाने व अरे-तुरेच्या भाषेत आवाज देऊन बोलवतात आणि पुकारा करतात.

जे व्यापारी म्हणून उभे असतात ते काहीच बोलत नाहीत. अडते त्यांना घ्या बरं काही पैसे कमी करतो, असे म्हणून एक, दोन, तीन रुपये किलोने पुकारा करून पुढे जातो. शेतकरी एक शब्दही बोलत नाही. कारण अडते म्हणतो द्यायचा असेल तर दे नाहीतर परत घेऊन जा. शेतकरी परत भाडे देऊन घेऊन जाऊ शकत नाही.

तसेच हमाल व काट्यावाला यांना रोख काही रक्कम द्यावी लागते. पैसे दिले नाहीतर वजन कमी येते. यावरून असे दिसते, की शेतकऱ्यांच्या मालावर अक्षरशः दिवसा-ढवळ्या डाका पडत आहे.

एखादा शेतकरी बाजार समितीकडे तक्रार घेऊन गेला तर समिती प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते, शेतकऱ्यांना कसलीच सुरक्षितता दिली जात नाही. काही वेळा तर आडते धमकावतात.

यावरून असे दिसते, की संबंधित बाजार समितीमधील अधिकारी व पदाधिकारी यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. ते शेतकऱ्यांसाठी काम न करता अडते व्यापारी यांचे हितसंबंध जोपासण्याचे काम करत आहेत.

आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात मीडियात कांदा उत्पादक शेतकरी लुटीच्या बातम्या पुराव्यासह आलेल्या आहेत, तरी त्यावर ठोस कसलीच कार्यवाही संबंधित बाजार समितीने केलेली नाही. म्हणजेच बाजार समिती आणि अडते मिलीभगत करून शेतकऱ्यांना लुटत आहेत.

जर बाजार समिती त्यांच्या आवारात शेतकऱ्यांची लूट करणारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करीत असेल तर सरकारने अशा बाजार समित्या बरखास्त कराव्यात.

बीड, उस्मानाबाद, लातूर, व इतर मराठवाड्यातील सर्वच तालुका, जिल्हा ठिकाणी असलेल्या बाजार समित्या बुजगावण्याचे काम करीत आहेत का? आपला शेतकरी लुटला जात आहे हे दिसत नाही का? पद हे काय फक्त मानसन्मान आणि हारतुरे एवढ्यासाठी आहे का? जर बाजार समिती माध्यमातून शेतकरी हीत आणि संरक्षणासाठी काम करता येत नसेल, तर समित्या बरखास्त कराव्यात.

संजय ज्ञानोबा शिंदे, हिंद संस्था नेकनूर, ता. जि. बीड : ९८५०५२३९६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT