१) मावळते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादांनंतर डॅमेज कंट्रोल म्हणून दत्तात्रय भरणे यांची कृषिमंत्रीपदी नियुक्ती.
२) इंदापूरचे आमदार भरणे यांनी सहकार क्षेत्रातून राजकारणात प्रवास सुरू करून सलग तीनवेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या.
३) त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, विविध सहकारी संस्थांतील पदे आणि राज्यमंत्रिपद भूषवले.
४) अजित पवार यांचे विश्वासू समर्थक म्हणून भरणे यांची ओळख; २०२३ च्या राष्ट्रवादी काँग्रेस फूटीनंतर पवार गटात.
५) शेतकरी पार्श्वभूमी आणि सहकारातील अनुभवामुळे कृषी खात्यातून अपेक्षा वाढल्या.
Pune : राज्याच्या राजकारणात मागच्या काही महिन्यांत मावळते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांनी आणि कृत्यांनी राळ उडवून दिली होती. यामुळे राज्य सरकारला टीकेचा सामना करावा लागला. या सर्वाची परिणीती म्हणून सरकारने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी इंदापूर मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय विठोबा भरणे यांना कृषिमंत्रीपदाचा पदभार दिला.काल, (ता.३१ जुलै) जाहीर झालेल्या मंत्रिमंडळातील बदलानुसार, दत्तात्रय भरणे यांना महाराष्ट्राचे नवीन कृषिमंत्री करण्यात आले आहे. या लेखात त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला आहे.
मंत्री दत्तात्रय भरणे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी (बी.कॉम.) प्राप्त केली असून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा त्यांना येत्तात. त्यांचे उच्च शिक्षण बारामती आणि पुणे येथे झाले. शेती आणि सहकार क्षेत्राशी असलेले त्यांचे नाते त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच दिसून येते.
सहकार क्षेत्रातील योगदान
दत्तात्रय भरणे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सहकार क्षेत्रातून केली. १९९२ मध्ये, वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी, ते भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बनले. यानंतर, १९९६ मध्ये त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली. २००१ मध्ये त्यांची या बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर २००२-२००३ मध्ये ते साखर कारखान्याचे अध्यक्षही होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या या योगदानामुळे त्यांना स्थानिक पातळीवर लोकप्रियता मिळाली.
राजकीय प्रवासाची सुरुवात
दत्तात्रय भरणे यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी १९९१ ते १९९९ या काळात काँग्रेस पक्षासाठी काम केले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने २००९ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी कॉंग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांनी पराभव केला.
२०१२ मध्ये त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. या काळात त्यांनी समाजकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले, ज्याची दखल घेत त्यांना २०१३ मध्ये अपंग कल्याणासाठीचा राज्य पुरस्कार मिळाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि विकासकामांना गतीसुद्धा दिली असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
विधानसभेतील यशस्वी प्रवास
दत्तात्रय भरणे यांनी २०१४ मध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि यावेळी त्यांनी यश मिळवले. त्यांनी तत्कालीन दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून इंदापूर मतदारसंघात विजय मिळवला. यानंतर २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी विजय मिळवला, ज्यामुळे ते सलग तीन वेळा इंदापूरचे आमदार बनले.
२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला, तेव्हा भरणे यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय आणि सामान्य प्रशासन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय, त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही करण्यात आले होते.
अजित पवारांसोबत निष्ठा
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, तेव्हा भरणे यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला. अजित पवारांचे विश्वासू समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा इंदापूरमधून निवडणूक जिंकली आणि हर्षवर्धन पाटील तसेच अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा पराभव केला. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ खात्यांचे कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. आता, ३१ जुलै २०२५ रोजी त्यांना कृषिमंत्रिपद देण्यात आले आहे.
वाद आणि टीका
दत्तात्रय भरणे यांच्या कारकीर्दीत काही वादही समोर आले आहेत. २०२४ मध्ये त्यांच्यावर एका व्यक्तीला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप झाला, ज्याबाबत सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. भरणे यांनी यावर कायदेशीर उत्तर देण्याची भूमिका घेतली. याशिवाय, २०२४ मध्ये त्यांना फोनद्वारे भावनिक ब्लॅकमेल करून १५,००० रुपयांची फसवणूक झाल्याची घटनाही समोर आली.
२०२४ मध्ये एका सभेत त्यांनी केलेल्या “सगळ्यांनी आपापल्या बायका घेऊन या” या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. तसेच, २०२५ मध्ये व्हॉलीबॉल खेळताना त्यांचा तोल जाऊन ते जमिनीवर पडले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर त्यांनी हलक्या-फुलक्या शैलीत प्रतिक्रिया देत, “जो पडतो तोच सावरतो,” असे म्हटले.
कृषिमंत्री म्हणून आता त्यांच्याकडे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाची मोठी जबाबदारी आहे. त्यांचा शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आणि सहकार क्षेत्रातील अनुभव यामुळे ते या जबाबदारीला न्याय देतील, अशी अपेक्षा आहे.
१) दत्तात्रय भरणे कोण आहेत?
– इंदापूरचे आमदार आणि अजित पवार गटाचे विश्वासू नेते, आता महाराष्ट्राचे कृषिमंत्री.
२) त्यांनी कोणत्या क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला?
– सहकार क्षेत्रातून; ते साखर कारखान्याचे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.
३) भरणे किती वेळा आमदार झाले आहेत?
– ते सलग तीन वेळा (२०१४, २०१९, २०२४) इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
४) त्यांनी कोणती महत्त्वाची पदे भूषवली आहेत?
– जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम, वने, मृद व जलसंधारण), सोलापूर पालकमंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री.
५) कृषिमंत्री म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत?
– शेतकरी पार्श्वभूमीमुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.