Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी ६८५ कोटी ७३ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत २८ हजार ५०१ शेतकऱ्यांना २०६ कोटी ८६ लाख ४२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. शेतकऱ्यांना आणखी येत्या ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकांसाठी कर्जवाटप केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत रब्बीत पेरण्या करणे शक्य होणार आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.
यंदा पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे उशिराने वाफसा येत आहे. त्यातच अनेक ठिकाणी ऊस गाळपास गेल्यानंतर शेतकरी गहू, हरभरा अशा पिकांच्या पेरण्या करतात. परंतु चालू वर्षी उशिराने साखर कारखाने सुरू होत असल्याने गहू, हरभरा पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात उशिराने होण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे रब्बीच्या कर्ज वाटपात फारशी वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी याच काळात २६९ कोटी ४७ लाख रुपये म्हणजेच ४५ टक्के पीककर्ज वाटप झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी काही प्रमाणात कर्ज कमी वाटप झाले आहे. परंतु येत्या काळात कर्ज वाटपात वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदाही पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर, तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत.
त्यामुळे रब्बीसाठी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बँकेने ६८५ कोटी ७३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये पूरक व्यवसायासाठी अल्प मुदतीचे ४ कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट यंदाचा रब्बी हंगाम संपेपर्यंत आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.
विविध पिकांना दिले जाते कर्ज
रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भूईमूग अशा अनेक पिकांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. त्यामुळे दर वर्षी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. बँकेकडून रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाचे नियोजन करून पिके घेतात.
तालुकानिहाय पीक कर्जाचे वाटप
तालुका झालेले वाटप
आंबेगाव ४५ कोटी ३३ लाख १५ हजार रुपये,
बारामती ४ कोटी ९५ लाख ३१ हजार
भोर १३ कोटी ६ लाख २९ हजार
दौंड ३ कोटी ७० लाख ५३ हजार
हवेली ४ कोटी ९२ लाख ९४ हजार
इंदापूर ९ कोटी १० लाख ७२ हजार
जुन्नर ४४ कोटी ६० लाख २९ हजार
खेड ३६ कोटी १९ लाख ४२ हजार
मावळ ५ कोटी ५२ लाख ९२ हजार
मुळशी १२ कोटी ४९ लाख ८ हजार
पुरंदर १९ कोटी ७ लाख ४३ हजार
शिरूर ४ कोटी २५ लाख ४३ हजार
वेल्हा ३ कोटी ६२ लाख ९१ हजार
एकूण २०६ कोटी ८६ लाख ४२ रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.