Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Update : विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा पिकांना तडाखा

Team Agrowon

Pune News : विदर्भात मंगळवारी (ता. १०) सकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला आहे. अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू आणि संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

पश्चिम विदर्भात अवकाळीने धुमाकूळ घालत गहू, लिंबू, आंबा व भाजीपालावर्गीय पिकांचे मोठे नुकसान केले. खामगाव तालुक्यात गारपीट झाली आहे. मराठवाड्यातही परभणी, बीड, लातूर जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे.

पूर्व विदर्भातील ब्रम्हपूरी (चंद्रपूर), अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत सोमवारी (ता.८) रात्री पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात गारपीट झाल्याने संत्रा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. वरुड, मोर्शी या भागात मंगळवारी (ता.९) पहाटे गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले.

त्याचा मोठा फटका या भागातील संत्रा बागायतदारांना बसला आहे. वरुड तालुक्‍यातील वघाळ, वाडेगाव, लोणी, शिंगोरी, इत्तमगाव, वंडली, वडाळा, नांदगाव, गाडेगाव, हातुर्णा या भागासह इतरही अनेक गावे बाधित झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात पावसाने भुईमूग पिकाचे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यातही तुरळक पावसाने हजेरी लावली.

पश्चिम विदर्भात धुमाकूळ

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत मंगळवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने गहू, लिंबू, आंबा व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान केले. तर खामगाव तालुक्यात गणेशपूर परिसरात गारपीट झाली. अकोला जिल्ह्यात पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर, अकोला तालुक्यात वादळामुळे गहू, लिंबू व इतर पिकांचे नुकसान झाले.

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात गणेशपूर, काळेगाव व इतर गावांमध्ये वादळी पाऊस तसेच बोराच्या आकाराची गारपीट झाली. नांदुरा तालुक्यात वादळी पाऊस झाला. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. पीक जमीनदोस्त झाले. टरबूज, खरबूज पिकांनाही मोठा फटका बसला.

परभणी जिल्ह्यात तडाखा

मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला. अनेक तालुक्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडात हलका ते जोरदार पाऊस झाला. रब्बी ज्वारी, गहू, फरदड कापूस, हळद, आंबा, टरबूज आदी फळपिकासंह भाजीपाल्याचे नुकसान झाले. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात रब्बीचे ज्वारीचे पीक आडवे झाले.

गहू, हळद भिजली. आंबा, टरबूज, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. हळद काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतीमालही भिजला. बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यात हलका पाऊस झाला. सायगाव, पोखरी, नांदगाव, सुगाव आदी शिवारांत पावसाचा जोर राहिला. लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला.

गारपिटीमुळे संत्रा बागायतदारांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बागायतदारांची स्थिती आधीच बिकट आहे. आता आंबिया बहाराबाबतही अनिश्चितता असून पंचनामे व सर्व्हेक्षण तत्काळ होण्याची गरज आहे.
- सुधाकर दोड, सरपंच, वाडेगाव, ता. वरुड, जि. अमरावती.
मोसंबी, संत्रा बागांचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले. शासनाने तत्काळ भरपाईबाबत निर्णय घ्यावा.
- धनंजय विंचूरकर, सरपंच, वाघाळ, ता. वरुड, जि. अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT