Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Crop Damage : नाशिक जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या ४५ हजार हेक्टरवरील पिकांची दाणादाण उडाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणि शिवारात पाणी असताना पुन्हा शुक्रवारी (ता.१८) सायंकाळनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे कसमादे भागात मोठा फटका बसला आहे. तर सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणा महसूल मंडलात ६९ मिमी इतकी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

अनेक भागांत मका, सोयाबीन, कांदा व कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. जिल्ह्यात पावसाने काही दिवसाचा खंड दिल्यानंतर पुन्हा दणका दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मालेगाव, सटाणा, कळवण, नांदगाव, सुरगाणा, चांदवड, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, येवला तालुक्यांत अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.

तर, दिंडोरी पेठ, इगतपुरी तालुक्यांत पावसाचा जोर काहीसा कमी होता. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा भागांत अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात वाचलेले मका, सोयाबीन अशा खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच मोठ्या प्रमाणावर खरीप पोळ व लेट खरीप रांगडा कांदा लागवडीचे नुकसान आहे. तसेच रब्बी कांदा रोपवाटिका बाधित झाल्याने संभाव्य उन्हाळ कांदा लागवडीवर मोठा परिणाम होत असल्याची स्थिती आहे.

गेल्या सप्ताहात झालेल्या अतिवृष्टीमुळे कसमादे भागाला मोठा फटका बसला. ४८९ गावांमध्ये अनेक ठिकाणी मका, सोयाबीन, कांदा, कांदा रोपवाटिका, भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष पिकांसह भात पिकांचे नुकसान आहे. ज्यामध्ये ७३ हजार शेतकरी नुकसानग्रस्त होते. त्यातच झालेल्या पावसामुळे दुसऱ्यांदा शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

शुक्रवारी (ता. १८) झालेल्या पावसाने सटाणा व मालेगाव तालुक्यांत मका पिकाचे नुकसान आहे. चांदवड, देवळा तालुक्यांतील काढणीस आलेला कांदा भिजल्याने तो काही ठिकाणी सडत असल्याचे दिसून येत आहे. पश्‍चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्‍वर व सुरगाणा तालुक्यांत भाताला पुन्हा मोठा फटका बसला आहे.

चाऱ्याचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून मक्याला पसंती दिली आहे. यातून चारा व धान्य दोन्ही मिळते. पूर्वीच्या पावसाने चारा भिजला होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर तो वाळण्यासाठी उन्हात पसरवला. मात्र झालेल्या पावसामुळे पुन्हा चारा मोठ्या प्रमाणावर पावसात भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

पावसामुळे नुकसान झाले असल्यास पीकविमा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत कृषिरक्षक ॲपवर किंवा १४४४७ या नंबरवर संपर्क करून पीकविमा नुकसान भरपाईसाठी तक्रार दाखल करावी.
- कैलास शिरसाठ, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT