Agri Expo 2024 : अलीकडील काळात हवामान बदल आणि पाण्याचे संकट तयार झाले आहे. अशा स्थितीत एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब आणि पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन केल्यास शेतीतील संकटांवर मात करणे शक्य आहे.
प्रयोगशील शेतकऱ्यांनीही हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने शेतीचे व्यवस्थापन करावे असे प्रतिपादन फळबाग व्यवस्थापन चर्चासत्रात तज्ज्ञांनी केले.
ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात शनिवारी (ता. १३) फळबागांचे व्यवस्थापन, सद्यःस्थितीतील संकट आणि कमी पाण्यातील पीक व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र झाले. यात बदनापूर (जि.जालना) येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.संजय पाटील, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ.एस. बी.पवार आणि पेडगाव (ता.जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी मंगेश देशमुख यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
डॉ.पाटील म्हणाले की बेमोसमी पाऊस, कमी पाऊसमान अशा समस्या आज तयार झाल्या आहेत. अशात मोसंबी फळबागांचे नियोजन करताना पाण्याची काटकसर आवश्यक आहे. पिकांसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करावा.
छाटणी, वळण देणे या बाबीही गरजेच्या आहेत. हवा तसेच प्रकाश या बाबी बागेला पुरेशा व व्यवस्थित मिळायला हव्यात. ज्यांच्याकडे पाणी कमी आहे त्यांनी आंबे बहराचे नियोजन करू नये.
बागा वाचविण्याचा प्रयत्न करावा. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी व्यवस्थापन करताना पाट पद्धतीने पाणी देऊ नये. अतिघन लागवड फक्त पानगळ होण्याऱ्या पिकांत शक्य आहे. अन्य पिकांत ही लागवड फायद्याची नसते.
फळांमध्ये विरळणी देखील महत्त्वाची आहे. उत्पादन दर्जेदार मिळण्यामध्ये त्याचाही वाटा आहे. कवठ, चिंच, आवळा, बोर या कोरडवाहू फळबागांकडे शेतकऱ्यांनी वळावे असेही डॉ. पाटील म्हणाले.
डॉ.पवार म्हणाले की आता वर्षभरात विविध टप्प्यांत पाऊस पडतो. पूर्वी पावसाचे वितरण समान होते. परंतु आता पावसाळ्यात पावसाचे दिवस कमी झाले आहेत. या संकटात शेतकऱ्यांनी एकच पीक वारंवार घेणे नुकसानीचे ठरत आहे. उत्पादकता, जमीन सुपीकता धोक्यात आली आहे. मराठवाड्यात कापूस, सोयाबीन या पिकांखालील क्षेत्र अधिक आहे.
बाजरी, ज्वारी, कारळा, मटकी, मूग अशी पिके फारशी दिसत नाहीत. परंतु बेवडसाठी पीक फेरपालट आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी ही पिके पौष्टिक अन्न म्हणून महत्त्वाची आहेत. शेतकऱ्यांनी प्रतिकूल स्थिती पाहता कमी पाण्यात येणाऱ्या पीकवाणांची निवड करावी असाही सल्ला डॉ. पवार यांनी दिली.
जल, मृद्संधारण आवश्यक - देशमुख
पेडगाव (ता.परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी मंगेश देशमुख यांनी आपले शेती व्यवस्थापन यावेळी समजावून देताना शेतीत यशस्वी होण्याचा मंत्र सांगितला. ते म्हणाले की आमचा भाग अवर्षणप्रवण आहे. मी पाण्यासाठी शेततळे घेतले. विहिरींचे पुनर्भरण केले. शेतीत जल, मृद्संधारण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संरक्षित कालावधीत फळबागेसाठी पाणी उपलब्ध झाले.
सातत्यपूर्ण व हमीच्या उत्पादनासाठी बाळानगर या सीताफळ वाणाची लागवड केली. त्यात झेंडू, कांदा आदी आंतरपिके घेतली जातात. सोयाबीनसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्राचा अवलंब केला आहे. त्यातही साडेतीन फुटांवर सरी हे अंतर ‘बीबीएफ’ तंत्रामध्ये आदर्श आहे. त्यातून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन साध्य करतो. मजुरीखर्च, वेळ व श्रम वाचविण्यासाठी शेतीची कामे यंत्रांच्या माध्यमातून करतो असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.