Amravati News : अमरावती जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र तरीदेखील १३ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून एकूण सरासरी क्षेत्राच्या ती दोन टक्के आहे.
यामध्ये सर्वाधिक प्रमाण कपाशीचे असून ९४४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. दररोज येणाऱ्या हवामानाच्या अंदाजाने आता शेतकरीही त्रस्त होऊ लागला आहे.
जून महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात ५३.४० मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस चिखलदरा तालुक्यात ९४.६० मिमी नोंदविण्यात आला आहे. सात जूनच्या आसपास मॉन्सूनचे आगमन अपेक्षित असून विदर्भात त्याचे आगमन १५ जूनच्या जवळपास होते. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली.
सर्वाधिक पेरणी कपाशीची झाली असून जिल्ह्यातील ९४४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरुड तालुक्यात सर्वाधिक प्रमाण असून ३६०९ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. त्याखालोखाल तिवसा १६००, अचलपूर १३५९ व धामणगावरेल्वे ९१४ हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली आहे.
कपाशीसोबतच सोयाबीन व तूर, या मुख्य पिकांचीही पेरणी करण्यात येत आहे. सोयाबीनखाली १७०३ व तुरीखाली २२१६ हेक्टर क्षेत्र आतापर्यंत आले आहे. तिवसा ९६०, मोर्शी १८० व चांदूररेल्वे तालुक्यात १७० हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आहे.
तर वरुड तालुक्यात १२९७, मोर्शी ३२० व तिवसा तालुक्यात ११० हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली. जिल्ह्यात या खरीप हंगामात ६.८० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी प्रस्तावित आहे. त्यापैकी आतापर्यंत १३,६९७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्राची सरासरी केवळ दोन टक्के आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.