Maharashtra Politics : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान कृषीमंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला. त्यांनी कर्जमाफीवर वक्तव्य करत शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतीत गुंतवणूक करण्यासाठी नाहीतर लग्न, साखरपुडे करण्यासाठी लागते असे अजब वक्तव्य केले. यावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज (ता.०५) पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांचा अपमान करण्याची संधी महायुती सरकार सोडत नाही. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "कृषीमंत्री कोकाटे सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर त्यांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकोटेंना मंत्रिमंडळातून हाकला". अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
सपकाळ पुढे म्हणाले की, "सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते ते अद्याप पाळलेले नाही. कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते, त्यात कर्जमाफीवरून कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेच्या घरचा नाही". असा थेट सवाल सपकाळ यांनी केला.
"सरकारची धोरणे जर शेती व शेतकऱ्याला अनुकुल असती तर शेतकरी सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहील. पण भाजपा युती सरकार हे शेतकरीविरोधी आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. मूठभर उद्योगपतींना १६ लाख कोटींचे कर्जमाफ केले तेव्हा असा प्रश्न विचारण्याची धमक कोकाटे किंवा सरकारने दाखवली नाही, मग शेतकऱ्यांनाच प्रश्न विचारण्याची हिंमत का होते". अशी खरमरीत टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
"कोकाटेंनी यापूर्वीही भिखारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देते असे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केला होता. सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा रोग या महोदयांना जडला आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी". अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.