
Maharashtra Politics : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार चर्चेत येत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्यावरून वक्तव्य केल्याने कोकाटे अडचणीत आले होते. यावर त्यांनी आता पुन्हा शेतकरी कर्जमाफीवरून वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत. कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफीच्या पैशांनी काय करता? साखरपुडे लग्न करत फिरता, असा अजब सवाल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला. यावरून विरोधकांनी कृषीमंत्री कोकाटे यांना सवालही केला.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करायला गेले होते यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. कोकोटे म्हणाले की, "कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचं तुम्ही काय करता? कर्जमाफी दिल्यावर एक रुपयाची तर शेतात गुंतवणूक केली का? सरकार आता शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे. शेतीच्या पाईपलाईनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात.
सरकार भांडवली गुंतवणूक देते. शेतकरी या पैशांचा त्याच कामासाठी उपयोग करतो का? शेतकरी म्हणतो कर्जमाफी पाहिजे, विम्याचे पैसे पाहिजे. आणि करतात काय... तर साखरपुडा करा, लग्न करा. या पैशांचा शेतीला काही उपयोग केला का? असा प्रश्न मंत्री कोकाटे यांनी विचारला.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात विरोधकांनी टीका करण्यास सुरू केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "कृषीमंत्र्यांना मोठया जबाबदाऱ्या असतात. विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये नुकसान झाले आहे. नाशिक भागात कांदे, डाळिंबाचे नुकसान झाले. या सगळ्यात कृषीमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देणे गरज असताना. पण हे सरकार संवेदना नसलेले आहे. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत," अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
राज्याला बिनडोक कृषीमंत्री मिळाला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत ह्याच मंत्र्यांनी केली होती. कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या थेट हातात मिळत नाहीत तर ते पैसे बँकेत जातात शेतकरी मुळात कर्जबाजारी का होतो? केंद्र सरकारने जो हमीभाव जाहीर केला आहे त्यापेक्षा कित्येक पट कमी दराने सरकार शेतकऱ्यांकडून पीक घेत आहे. अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असताना कृषीमंत्री बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. अशी खरमरीत टीका शेट्टींनी केली आहे.
माणिकराव कोकाटे म्हणजे कृषीक्षेत्रातील कुणाल कामरा
संजय राऊत म्हणाले की, "माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा बनलेत. कृषीमंत्री कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत. शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करू नये. ते अशी विधानं का करत आहेत? अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरे नाही. त्यांची भाषणं ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केले आहेत. स्वतः अजित पवार हे कॉमेडी शो करत आहेत. सध्या त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल त्यांचा देखील कॉमेडी शो सुरू आहे, तो पडतो. राज्याचे कृषीमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. खिल्ली उडवत आहेत". अशी टीका संजय राऊत यांनी केली.
अजित पवारांच्या वक्तव्याने खळबळ
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी आशा लागलेली असतानाच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात मोठं भाष्य करत शेतकऱ्यांनी आपआपले कर्ज भरण्याचे त्यांनी सांगितले. यावरून अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.