Buldana News : जिल्ह्यात पूर्णा खोऱ्यात खारपाण क्षेत्र विस्तारलेले असून पावसाच्या पाण्यावरच ही शेती केली जाते. मात्र आता नवीन पिढी या जमिनीत प्रयोग करू लागली आहे. शेगाव तालुक्यातील पहूरपूर्णा येथील आदित्य दळवी या तरुणाने दोन किलोमीटर पाइपलाइन करून पूर्णा नदीचे गोडे पाणी शेतात आणून मागील तीन हंगामांपासून मिरची, भाजीपाल्याची शेती सुरू केली. यात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तो यशस्वी होऊ लागला आहे. इतरांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब म्हणून पाहल्या जात आहे.
दोन दिवसांपूर्वी जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्रामार्फत मिरची पिकातील शेती दिवस आदित्यच्या शेतात घेण्यात आला होता. या वेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. आदित्यने बेड व मल्चिंगपेपरवर मिरचीची लागवड केली आहे. ही मिरची पाहून अनेकांनी त्याच्या व्यवस्थापनाचे तोंडभरून कौतुक केले. ही शेती खारपाण पट्ट्यात मोडते. जमिनीत क्षारयुक्त पाणी असून ते पिण्यासाठी तसेच सिंचनालाही योग्य मानले जात नाहीत. अधिक पाणी झाले तर जमिनीवर क्षारांचा थर जमा होतो.
आदित्यच्या कुटुंबाकडे सुमारे ५० एकर शेती आहे. संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावरच कसली जात होती. एम.कॉम. शिकलेल्या आदित्यने आता पूर्णवेळ शेती करण्याचे ठरवले. गेल्या तीन हंगामांपासून तो मिरचीचे पीक या शेतीत घेत आहे. मागील वर्षात एकरात १३५ क्विंटलपर्यंत या भागात त्याचे उत्पादन राहले.
बेड, मल्चिंगपेपर, ठिबक, नदीतील गोडे पाण्याचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर याप्रकारच्या व्यवस्थापनातून अपेक्षित उत्पादन तो गाठू शकला. आता दीड-दीड एकरात दोन प्लॉट त्याने लावले आहेत. टप्प्याटप्प्याने ही लागवड केली असून एका प्लॉटमधून लवकरच मिरची तोडणी सुरू होणार आहे.
केव्हीकेचे तांत्रिक मार्गदर्शन
जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय बागवनी संशोधन संस्था (बंगलोर) संशोधित अर्का मिक्रोबियल कन्सोर्सियम उत्पादनाचे प्रथम रेषिय प्रात्यक्षिक देण्यात आले. मिरची पिकात पाच किलो कन्सोर्शियम जमिनीतून देण्यात आले. यात नत्र, स्फुरद, पालाश व जिवाणूजन्य इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यात आली.
या वेळी केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ शशांक दाते यांनी भाजीपाला पिकातील या नावीन्यपूर्ण कन्सोर्शियमचे महत्त्व मांडले. कीड-रोग तज्ज्ञ अनिल गाभने यांनी शेतात उत्पादित होणाऱ्या जिवाणूजन्य उत्पादनाचा वापर आणि उत्पादन कसे करावे हे सांगितले. या कार्यक्रमासाठी कृषी सहायक डी. एन. राठोड, कृषी पर्यवेक्षक एस. डी. कराडे उपस्थित होते.
मिरची पीक खारपाण भागात सुद्धा चांगल्या पद्धतीने येण्यासाठी योग्य नियोजन व तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. यादृष्टीने आदित्य दळवी यांना सुरुवातीपासून ते काढणीच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले जात आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.- शशांक दाते, उद्यानविद्या तज्ज्ञ, केव्हीके, जळगाव, जि. बुलडाणा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.