Fertilizer Market : अहिल्यानगर : देशातील शेतकऱ्यांना कमी दरात खते मिळावीत यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांना रास्त भावात खते मिळण्यासाठी ३ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास भरपाईसाठी सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांचे नुकसान पाहून कुणालाही मध्यस्थी न ठेवता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम टाकली जाणार आहे. महाराष्ट्रात विमा योजनेकरिता ६९ हजार कोटींची तरतूद कॅबिनेट बैठकीत करण्यात आल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
कृषीमंत्री चौहान यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्या वर्षानिमित्त शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथे सहकुटुंब शनिदर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चौहान म्हणाले, ‘‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून सोयाबीनची खरेदी सुरूच राहणार तसेच कांदा निर्यात शुल्क रद्द केले आहे. शेतकऱ्याची सेवा हीच परमेश्वराची सेवा समजून मी कृषी खात्यामध्ये अमुलाग्र बदल करणार आहे.
शेतकऱ्यांच्या पिकाला आधारभूत किंमत देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अतिवृष्टीत शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यास सॅटेलाइटद्वारे पिकाची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. सोयाबीन, कांदा पिकाला जास्तीत जास्त भाव देण्याचा सरकारचा मानस आहे. तांदळाचे निर्यात धोरण लवकरच हाती घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ हे वर्ष शेतकऱ्यांना समर्पित केले असून देवाची पुजा समजून संपूर्ण देशात विविध विभागांच्या वतीने सेवाकार्य सुरू आहे.’’
शेतकऱ्यांना रास्त भावात खते मिळण्यासाठी ३ हजार ८०० कोटी रुपये तर महाराष्ट्रात विमा योजनेकरिता ६९ हजार कोटींची तरतूद कॅबिनेट बैठकीत करण्यात आली आहे. कांद्याचे निर्यातमूल्य ४० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नाफेड व इतर संस्थेकडून कांदा खरेदी सुरू ठेवण्याचाही निर्णय झाल्याचे कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले. दिल्लीतील शेतकऱ्यांना तेथील राज्य सरकार लाभ देत नसल्याची टीका त्यांनी केली.या वेळी आमदार विठ्ठलराव लंघे, मराठा महासंघाचे सरचीटणीस संभाजी दहातोंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्र्यांचा साधेपणा
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोनई येथील कुसळकर वडापावच्या हातगाडीवर थांबून वडापाव व चटकदार भज्यांचे पार्सल घेतले तर सर्व परिवारासह वंजारवाडी येथील रसवंतीगृहातील उसाच्या रसाची चव चाखली. दोन्ही ठिकाणी पोलिस यंत्रणा व सर्व लवाजमा थांबल्याने सुरक्षेसाठी तैनात असलेल्यांची चांगलीच धांदल व तारांबळ उडाली. कृषिमंत्र्यांचा साधेपणा लोकांना भावला. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी संत तुकाराम महाराज यांची पगडी घालून कृषिमंत्री चौहान यांचा सन्मान केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.