Bioplastic  Agrowon
ॲग्रो विशेष

Pollution Control : प्रदूषण नियंत्रणात जैवप्लॅस्टिक मोलाची भूमिका बजावेल

मनोज कापडे

Pune News : “प्लॅस्टिकची समस्या जगभर झपाट्याने विस्तारत आहे. त्यामुळे ‘प्राज’कडून आता विघटन होणारे प्लॅस्टिक तयार केले जात आहे. प्रदूषण नियंत्रणात संशोधित जैवप्लॅस्टिक मोलाची भूमिका बजावेल,” असे भाकीत ‘इथेनॉलमॅन’ असा लौकिक मिळवणारे प्राज उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले.

पुण्यात शुक्रवारपासून (ता.९) माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजिलेल्या तीन दिवसीय अपारंपरिक ऊर्जा विषयक राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते. पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ‘प्राज’चे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र उटगीकर, पर्यावरण पत्रकार अतुल देऊळगावकर, द इंटरन्यूज अर्थ जर्नालिझम नेटवर्कचे (इजीएन) व्यवस्थापक जयदीप गुप्ता या वेळी उपस्थित होते.

यावेळी जैवइंधन क्षेत्राचा अभ्यासपूर्ण आढावा डॉ. चौधरी यांनी घेतला. चार दशकांपासून ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या ‘प्राज’कडून पुण्याच्या जेजुरी भागात पॉलिलॅक्टिक अॅसिडवर आधारित जैवप्लॅस्टिकचा पथदर्शक प्रकल्प यापूर्वीच उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाद्वारे खाद्ययोग्य लॅक्टिक अॅसिड व पॉलिलॅक्टिक अॅसिड निर्मितीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘अन्न व ऊर्जा सुरक्षेत जैवइंधन महत्त्वपूर्ण ठरेल. या क्षेत्रात भारत मोठी भरारी घेत आहे. सौर ऊर्जा मुबलक आहे. शेतीमालापासून अन्न, ऊर्जा व पशुआहार हे तीन घटक तयार करणे आता शक्य झाले आहे. भारताने जागतिक जैवइंधन मंच स्थापन केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

या क्षेत्राचा कच्चा माल शेतकऱ्यांकडून येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळण्याचे दिवस आले आहेत. याशिवाय प्रदूषण व कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण येईल. देशात आता हरित हायड्रोजन युगालादेखील सुरवात झाली आहे. आम्ही बायोगॅसमधील मिथेनपासून हायड्रोजन तयार करण्यासाठी धडपडत आहोत. यात काही व्यावसायिक करणे अडचणी आहे. मात्र, काळानुसार त्यावर मात केली जाईल.’’

डॉ. उटगीकर म्हणाले, ‘‘ऊर्जाकेंद्रित अर्थव्यवस्था आता हायड्रोकार्बनकडून कार्बोहायड्रेटसकडे प्रवास करते आहे. जगाच्या शाश्वत व हरित ऊर्जा उत्पादनात भारत आता स्वयंपूर्ण होण्याची क्षमता बाळगून आहे. जैवइंधन व अपारंपरिक क्षेत्रातील देशाची वाटचाल रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची समृद्धी, पर्यावरण संरक्षण व परकीय चलनात बचत करणारी ठरेल. विशेष म्हणजे जैव इंधन क्षेत्रात सरकारी धोरणाच्याही पुढे जाऊन ‘प्राज’ उद्योग प्रगती करतो आहे.’’ या वेळी श्री. गुप्ता व श्री. देऊळगावकर यांच्यासह कस्टमाईज्ड एनर्जी सोल्युशन्स् (इंडिया) चे संचालक हर्ष ठक्कर, ‘प्रयास’चे प्रतिनिधी आश्विन गंभीर यांनी संवाद साधला.

‘प्रकल्प त्रासदायक ठरु नयेत’

डॉ. गाडगीळ यांनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांच्या उभारणीमुळे पर्यावरण व मानवी संस्कृतीवर होत असलेल्या दुष्परिणामवर प्रकाश टाकला. “विकासासाठी प्रकल्प उभारायला हवेत. मात्र, निसर्गाचा ह्रास आणि मानवी समूहांना त्रास देत विकास साधाणारी धोरणे उपयोगाची नाहीत. अनेक प्रकल्पांमुळे जैवविविधता धोक्यात आली. परिसरातील पारंपरिक मानवी संस्कृती नष्ट झाली,” असे ते म्हणाले.

‘वन्यजीव संरक्षण नव्हे; ही झुंडशाही’

‘‘वन्यजीव संरक्षण तसेच पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली धोरणे राबवणारी यंत्रणा झुंडशाहीचे प्रदर्शन करते आहे. बिनचूक शास्त्रोक्त अभ्यास, मानवी समूहाची सोय विचारात घेत वन्यजीव किंवा पर्यावरण विषयक उपक्रम राबवायला हवेत. मी नकारात्मक भूमिका घेत नसून जी सत्य स्थिती आहे, ती दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे,’’ असे परखड विचार डॉ.गाडगीळ यांनी मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT