Pune News: देशात आता अधिक अचूक हवामान अंदाजासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली भारत फोरकास्ट सिस्टिम ही प्रणाली वापरली जाणार आहे. त्यामुळे हवामान, पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, वादळाची जास्त अचूक माहिती मिळणार आहे. आतापर्यंत चार ते पाच गावांचा एकत्रित अंदाज मिळत होता. पण आता गावपातळीवरचा अंदाजही मिळणार आहे.
पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अर्थात ‘आयआयटीएम’ने ही प्रणाली विकसित केली आहे. हवामान अंदाजाची जास्त अचूक आणि सखोल माहिती देणारी ही प्रणाली आहे. अशी प्रणाली विकसित करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. या प्रणालीमुळे अचूक अंदाज देण्याची क्षमता ६७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, तसेच तसेच सहा किलोमीटरच्या परिघात गावपातळीवर अंदाज देणे शक्य होईल, असे सांगण्यात आले.
केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते सोमवारी या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. कृषी, मॉन्सून ट्रॅकिंग, विमान वाहतूक, चक्रीवादळ आणि आपत्ती व्यवस्थापन, जलमार्ग, संरक्षण, पूर व्यवस्थापन या बाबतीत प्रमुख मंत्रालयांना या प्रणालीची मदत होईल, असे ते म्हणाले.
या प्रणालीच्या २०२२ पासून चाचण्या सुरू होत्या. या चाचण्यांमधून मिळालेल्या माहितीवरून या यंत्रणेची हवामान अंदाज देण्याची अचूकता ३० ते ६७ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मॉन्सून, दोन तासांचा हवामान अंदाज, गारपीट-अतिवृष्टीसारख्या घटना आणि वादळासंबंधी माहिती देण्याची अचूकता वाढली आहे.
शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि इशारा देण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग आता भारत फोरकास्ट सिस्टिमचा वापर करणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन म्हणाले, ‘‘आतापर्यंत आम्ही चार ते पाच गावांचा एकत्रित अंदाज देऊ शकत होतो. पण आता गावपातळीवर अंदाज देता येणार आहे. तसेच सहा किलोमीटरच्या परिघात असलेल्या गावांचा अंदाज देता येणे शक्य आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार आहे. या पातळीवर अंदाज देण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचे काम जागतिक पातळीवरील अनेक हवामान संस्था करत होत्या. पण भारताने सर्वांत आधी भारत फोरकास्ट सिस्टिम विकसित केली.’’
‘आयआयटीएम’चे संचालक ए. सूर्यचंद्र ए. राव म्हणाले, ‘‘अतिवृष्टीसारख्या घटनांचा अंदाज देण्याची अचूकता या यंत्रणेमुळे ३० टक्के वाढली आहे. मॉन्सूनच्या अंदाजाची अचूकता ६७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तसेच वादळासारख्या घटनांच्या अंदाजाची अचूकता वाढली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम उष्णकटीबंधीय देशांसाठी विशेष फायदेशीर आहे.’’
भारत सहा किलोमीटरच्या परिघातील हवामान अंदाज देणारा पहिलाच देश ठरणार आहे. प्रत्येक कुटुंबाला वेळेत उपाययोजना करता याव्यात यासाठी त्यांच्या गावातील हवामान अंदाज देण्याचे व्हिजन ठेवले होते. आता हे व्हिजन पूर्ण होणार आहे. भारताचे हे मोठे यश आहे.मृत्युंजय मोहपात्रा, महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.