Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : मेहुणबारे परिसरात गारपिटीमुळे केळी, कांद्याचे पीक भुईसपाट

Crop Damage : सलग दोन दिवस गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला गेला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : अगोदरच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांवर सोमवारपासून (ता. २६) पुढे दोन दिवस अवकाळीचे संकट कोसळल्याने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. सलग दोन दिवस गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला गेला आहे.

निसर्गाच्या या कोपामुळे जगावे तरी कसे? असा प्रश्‍न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. पीक जोमात असताना ते जमीनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आज प्रशासनाने काही भागात कालच्या नुकसानीचे पंचनामे केले असून मंगळवारी (ता. २७) पुन्हा झालेल्या नुकसानीचेही पंचनामे तत्काळ करावेत, अशी मागणी होत आहे.

मेहुणबारेसह परिसरातील धामणगाव, जामदा, भऊर, खडकीसीम, दसेगाव, लोंढे, दरेगाव, पिंजारपाडे, विसापूर, चिंचगव्हाण, कृष्णापुरी तांडा, वरखेडे तांडा, वरखेडे गाव, पळासरे, पिंपळवाडी, दहिवद भागात चक्रीवादळ आले. जवळपास २० ते २५ मिनिटांच्या या वादळामुळे या परिसरातील शेतांमधील पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. वादळ सुरु असताना काही भागात मोठ्‍या प्रमाणावर गारपीट झाली. ज्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, केळी, पपई, शेवगा, टरबूज, लिंबू आदींचे नुकसान झाले. शेतांमध्ये गारांचा खच पडला होता.

वादळाचा जोर इतका अधिक होता, की शेतातील मल्चिंग पेपर फाटून काही शेतांमध्ये शेडनेट उडाले तर काही ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडले. केळीचे अतोनात नुकसान विहिरींना असलेल्या जेमतेम पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी केळीचे पीक जगवले होते, ती केळी देखील वादळवाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. विशेषतः वरखेडे भागातील केळीला वादळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला.

या भागातील सर्वच्या सर्व केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. केळीचे पीक काढणीवर आलेले असतानाच होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. भय्या राजपूत व राहुल पाटील यांच्या शेतातील केळी घेण्यासाठी व्यापारी येणार होते. मात्र, त्यापूर्वीच दोन्हींच्या शेतातील केळीची झाडे उन्मळून पडली.

३२ गावांमध्ये झाले पंचनामे

गारपीट व वादळी पावसामुळे ३२ गावांमधील ३ हजार ५९३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले असून यात ५ हजार ६५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. असे असले तरी प्रत्यक्षात हा आकडा किती तरी प्रमाणात मोठा आहे. वलठाण, पाटणा, चंडिकावाडी, बेलदारवाडी, गणपूर, कोदगाव, गणेशपूर, चितेगाव, पिंप्री बुद्रूक व प्र.चा., वाघडू, तांबोळे बुद्रूक व खुर्द, निमखेडी, बाणगाव, रांजणगाव, पिंपरखेड, शिवापूर, लोंजे, आंबेहोळ, खेरडे, सोनगाव, बोढरे, सांगवी, तळोंदे, जामदा, सायगाव, अलवाडी, नांद्रा, पिंपळवाड म्हाळसा गावात पंचनामे झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Update: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज

Farmer Relief : ‘गुरुदत्त शुगर्स’च्या मदतीने पूरग्रस्त सुखावले

Crop Loss inspection: २६ जिल्ह्यांमध्ये पंचनामे रखडले; दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल?

PDKV Akola : कृषी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान वापरा

Sangli Rainfall : सांगलीत सप्टेंबरमध्ये १४६ टक्के पाऊस

SCROLL FOR NEXT