Beed News : परळी येथील कृषी महोत्सवाच्या पहिल्या तांत्रिक सत्रात कपाशी सघन लागवड तंत्रज्ञान, सेन्सर आधारित जलसिंचन व्यवस्था, हवामान आधारित कृषी सल्ला व शेती व्यवस्थापन, बदलत्या हवामानात कृषी यांत्रिकीकरण व त्याचे महत्त्व याविषयी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पंडागळे, राहुरी कृषी विद्यापीठचे डॉ. वैभव मालुंजकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख व संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी आदींनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. बी. व्ही. आसेवार तर उपाध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. टी. एस. मोटे तर संकलक म्हणून डॉ. के. के. झाडे होते. डॉ. एस. बी. पवार यांनी नियोजन केले. डॉ. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सूर्यवंशी व ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक साळवे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. हनुमान गरुड यांनी तर डॉ. गजानन गडदे यांनी आभार मानले.
हवामान आधारित सिंचन प्रणाली उपयोगी
सेन्सर आधारित जलसिंचन व्यवस्थेविषयी डॉ. वैभव मालुंजकर म्हणाले, की जमिनीतील ओलावा आधारित सिंचन प्रणाली महत्त्वाची आहे. हवामानातील घटकांची प्रत्यक्ष वेळेनुसार नोंद करण्याकरिता विविध प्रकारचे स्वयंचलित हवामान संच आहेत जमिनीतील पिकाच्या मुळाच्या कक्षेमधील ओलाव्याच्या आधारित सिंचन वेळापत्रक या संचाद्वारे ठरविले जाते प्रवाही सिंचन तुषार सिंचन ठिबक सिंचन पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे पाणी वीज आणि मनुष्यबळाची बचत होते.
शास्त्रोक्त व्यवस्थापन फायद्याचे
हवामान आधारित कृषी सल्ला व शेती व्यवस्थापन याविषयी डॉ. कैलास डाखोरे म्हणाले, की बदलत्या हवामानामुळे व्यवस्थापन काटेकोर हवे. सद्यःस्थितीत सोयाबीन कपाशी, तूर आदी वाढीच्या संवेदनक्षम अवस्था आहेत.
त्यामुळे शास्त्रोक्त व्यवस्थापन फायद्याचे ठरून नुकसान टाळता येते. यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारे देण्यात येणारे प्रतिआठवडा कृषी हवामान संदेश सर्व शेतकऱ्यांनी नियमित लक्षात घ्यावे.
रुंद वरंबा सरी व टोकन पद्धत योग्य
बदलत्या हवामानात कृषी यांत्रिकीकरण व त्याचे महत्त्व याविषयी डॉ. स्मिता सोळंकी म्हणाल्या, की बदलत्या हवामानात रुंद वरंबा सरी, टोकन पद्धत अत्यंत योग्य आहे. अति पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होऊन पीक उमरण्यापासून बचावते. अतिरिक्त पाणी जमिनीत मुरते. पावसाच्या खंडात साठवलेला ओलावा पीक वाढीस व उत्पादकता वाढविण्यास मदत करतो.
सघन कपाशी लागवड उपयुक्त
सघन कापूस लागवड केल्यामुळे सरासरी उत्पादकता पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त येते असे मत डॉ. अरविंद पंडागळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की देशाची कापसाची सरासरी उत्पादकता ४४१ किलो रुई प्रतिहेक्टर आहे तर महाराष्ट्राची ३३१ किलो प्रतिहेक्टर आहे.
मराठवाड्याची २०२३-२४ची कापसाची उत्पादकता २४० किलो रुई प्रतिहेक्टर आहे. तुलनेने ऑस्ट्रेलियात २२४० किलो प्रतिहेक्टर, ब्राझीलमध्ये १८२३ किलो रुई प्रतिहेक्टर, चीनमध्ये १९५० किलो रुई प्रतिहेक्टर, तुर्कस्तानमध्ये १५५६ किलो रुई प्रतिहेक्टर आहे. राज्यातील कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी सघन लागवड अत्यंत उपयोगी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.