Girna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : जलसाठा घटू लागला गिरणातील आवर्तन थांबले

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात जलसाठा दर आठवड्याला कमी होत आहे. आजघडीला एकूण जलसाठा ४० टक्क्यांपर्यंत आला आहे. गिरणा धरणातील जलसाठा सुमारे ३९ टक्के एवढा आहे. तसेच अन्य धरणातूनही उपसा, पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने जलसाठा खानदेशात कमी होत आहे.

सर्वात मोठ्या गिरणा धरणात यंदा फक्त ५६ टक्के जलसाठा होता. २०१९ ते २०२२ या दरम्यान हे धरण १०० टक्के भरले होते. त्याची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. पण त्याचा सर्वाधिक लाभ जळगावमधील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व धरणगावात होतो. तसेच उद्योगांसह शहरांनाही त्यातून पाणी दिले जाते. या धरणावर मोठ क्षेत्र अवलंबून आहे.

तब्बल २१ हजार हेक्टरला रब्बीसंबंधी त्यातून पाणी दिले जाते. परंतु यंदा रब्बीला पाणी दिलेले नाही. या धरणातून पाच वेळेस नदीत आवर्तन सोडण्याचे प्रशासनाचे आदेश आहे. त्यातून दोन वेळेस नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. पाचोरा, भडगाव शहर व नदीकाठच्या सुमारे ११० गावांच्या पाणी योजनांचे स्रोत पुनर्भरण करण्यासंबंधी या धरणातील आवर्तनाचा उपयोग केला जातो.

मागील महिन्यात त्यातून दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते. नदीत पाणी कानळदा (ता. जळगाव) पर्यंत पोचल्यानंतर हे आवर्तन बंद झाले. अलीकडेच आवर्तन बंद करण्यात आले आहे. गिरणा धरणातील जलसाठा ३९ टक्क्यांखाली आला आहे. आवर्तन सोडल्यानंतर हा साठा दोन टक्क्यांनी कमी झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, हतनूर, यावलमधील गारबर्डी, मोर, चोपड्यातील गूळ, जामनेरातील तोंडापूर, वाघूर हे प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. यातील साठाही घटला आहे. हतनूरमधून अलीकडेच रब्बीसाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे.

रावेर, यावल व चोपड्यातील रब्बीला त्याचा लाभ होत आहे. सुमारे ११ हजार हेक्टर यातून भिजत आहे. हतनूरमधील जलसाठाही ६५ टक्क्यांपर्यंत आहे. हतनूरमधूनही भुसावळ शहर, जळगावातील औद्योगिक वसाहत, वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी, दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक वीज प्रकल्पास पाणी दिले जात आहे. या धरणात ५४ टक्के गाळ असल्याने त्यातील जलसाठा झपाट्यात कमी होते. वापरायोग्य पाणी मेमध्येच कमी होते.

जामनेरातील वाघूर प्रकल्पातही सध्या सुमारे ६८ टक्के जलसाठा आहे. त्यातून जळगाव व जामनेर शहर, उद्योग व भुसावळ, जळगावातील रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन दिले जात आहे. दोन आवर्तने त्यातून देण्यात आली आहेत. जळगावातील अग्नावती, बहुळा, अंजनी, भोकरबारी या प्रकल्पांतील जलसाठा अल्प आहे. तर मन्याड प्रकल्पात कुठलाही जलसाठा नाही.

धुळ्यातील जलसाठा अल्प

धुळ्यात फक्त पांझरा व अनेर हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. बुराई, मालनगाव, सोनवद, अमरावती या प्रकल्पांत अल्प जलसाठा होता. त्यामुळे धुळ्यातील कमाल तलाव व लघु प्रकल्प कोरडे आहेत. एकूण जलसाठा ३६ टक्क्यांखाली धुळ्यात असल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील दरा व देहली हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. परंतु नंदुरबार तालुक्यातील प्रकल्पांत ठणठणाट आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT